– प्रतिनिधी
12 जुलै, 1961 रोजी पानशेत धरण फुटले आणि पुण्यात हाहाकार माजला. 12 जुलै, 2021 रोजी ह्या घटनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. शैली ही “12 जुलै, 1962′ या कादंबरीची नायिका. ती आर्किटेक्ट आणि भरतनाट्यम् नृत्यांगना असते. ती एक जुन्या पद्धतीचा वाडा बांधत असते.
वाड्याच्या सजावटीसाठी तिला जुन्या अँटिक वस्तू हव्या असतात. पुण्यातल्या जुन्या बाजारात तिला काही खास वस्तू मिळतात. तिचा प्रियकर-मित्र चित्ततोष हा भाषाविद् असून त्याचा लॅंगवेज ब्यूरो असतो. जुन्या बाजारातली खास गोष्ट पाहून चित्ततोषच्या बालपणीच्या स्मृती जागृत होतात.
त्यातून सुरू होतो आठवणींचा पाठलाग. त्यात यांना पानशेत पुरासंबंधीचे काही धागेदोरे सापडतात. शैलीची आई प्रतिभा ही ख्यातनाम लेखिका असते. प्रतिभाचा मित्र सुदर्शन हा पुरातत्व अभ्यासक असतो. प्रतिभाने पानशेत दुर्घटनेविषयी लेखन केलेले असते.
त्यातून व अन्य स्रोतांतून ह्या तरुणांना बरीच माहिती मिळते. चित्ततोषचा भाऊ ऋतुपर्ण हा पर्यावरण अभ्यासक, कवी-लेखक असतो. त्याच्या जलस्रोतांच्या, धरणांच्या अभ्यासातून काही संदर्भ मिळतात.
तीन पिढ्यांमधील घटना-पटातून, नव्या-जुन्या पात्रांच्या माध्यमातून कथा-उपकथांची वीण 1960च्या व त्याच्याही आधीच्या दशकांपर्यंत पोहोचते. तो ह्या तरुणांच्या आजी-आजोबांच्या तारुण्याचा काळ असतो. 50-60 वर्षांपूर्वीच्या पुण्यातला काळ असतो.
अनेक घटनांचे अन्वय जोडताना पानशेत दुर्घटनेच्या पोटात लपलेल्या अनेक कथा, उपकथा, व्यथा, मनोविश्लेषण, पुराचे प्रत्यक्ष वर्णन, पेठांमधील वाताहात, तुटलेली/जुळलेली कुटुंबे/माणसे, माणसाचे विपत्तीतील भले-बुरे वर्तन तसेच पुरानंतरचे आधुनिक पुणे हे सारे साकारते.
चित्ततोषच्या आजोबांच्या विफल प्रेमकहाणीसह छोट्या मोठ्या घटनांतून कथानक फुलते. शैलीने बांधलेल्या प्रशस्त वाड्यामध्ये सर्व संबंधितांचा स्नेहमेळा जमतो व आजोबांच्या प्रेमकहाणीचे रहस्य उलगडते.
1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढा झाला. त्यानंतर 1961 मध्ये वर्षभरात उद्भवली पानशेत दुर्घटना. “हिंदी-चिनी भाई-भाई’ हा घोष चालू असतानाच 1962 मध्ये चीनने आक्रमण करून भारताच्या पाठीत खंजीर खुपसले. एक घटना प्रांतीय, दुसरी स्थानिक तर तिसरी द्विराष्ट्रीय! प्रांतीय व द्विराष्ट्रीय घटनांच्या मध्ये घडली ही स्थानिक पानशेत दुर्घटना!
हे धरण का, कसे फुटले? पुण्याचे पाऊसमान, धरण-क्षेत्राचे मातीपरीक्षण यांचा नीट अभ्यास करूनच मातीचे धरण बांधले ना? धरण अपेक्षित वेळेपूर्वी घाईने पूर्ण का करण्यात आले? या आपत्तीची पूर्वकल्पना तज्ज्ञांना व अभियंत्यांना आली नव्हती का? त्यात भ्रष्टाचार व राजकारण होते का? पुणे पोलिसांची काय भूमिका होती? अनेक प्रश्न. काहींची उत्तरे सापडतात, काहींची नाही.
275 पानांची ही कादंबरी आश्लेषा महाजन यांनी लिहिली आहे. पानशेत दुर्घटनेच्या 60व्या स्मरणवर्षी- 12 जुलै, 2021 रोजी प्रकाशित होत आहे. इंकिंग इनोव्हेशन्स ही संस्था कादंबरी प्रकाशित करत आहे. मुखपृष्ठ साकारले आहे अजय प्रभाकर यांनी तर आतील चित्रे डॉ. मयुरी वाघ यांनी रेखाटली आहेत.