एखाद्या यशस्वी पुरूषाच्या मागे महिलेचा हात असतो असे म्हटले जाते; मात्र कुठल्याही पाठबळाशिवाय यश आपल्या पदरामध्ये पाडणारी एखादी महिलाच असू शकते. इतिहास काळापासून अशा अनेक महिला आहेत; त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने शून्यातून विश्वनिर्मिती करून इतिहास घडवून आपल्या कार्यकर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटवला आहे.
यात अनादी काळापासूनच्या सैरंध्रीपासून जिजामाता राणी लक्ष्मीबाई, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अंतराळवीर कल्पना चावला त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील अनेक महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपण काम करत असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केले आहे. याच कार्यकर्तृत्व संपन्न महिलांच्या पावलावर पाऊल ठेवून 21व्या शतकातही औद्योगिकरणाच्या व संगणक युगाच्या काळात आपला ठसा उमटविला आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे सौभाग्यवती वंदनाताई सुरेश पोटे हे होय.
सेलिब्रिटींमार्फत महिलांना मार्गदर्शन
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, मराठी सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, निशिगंधा वाड, प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून वंदनाताईंनी महिलांना मार्गदर्शन केले आहे. याचा महिलांना निश्चितच फायदा होईल. वंदनाताई पोटे यांची समाजकार्याची दखल घेत दिल्लीस्थित भारतीय मीडिया फाऊंडेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महिलांसाठी निर्माण केला रोजगार
खरेदी-विक्रीचा व्यवसायात यश संपादन केल्यानंतर वंदनाताईंनी आपल्या भावालाही आपल्या बरोबर व्यवसायामध्ये सहभागी करुन घेतले. सन 2011 साली वंदनाताई कारेगाव येथे वास्तव्यासाठी आल्या व आपल्या व्यवसायामध्ये वाढ करत गायत्री इंडस्ट्रीज नावाने नवीन व्यवसाय सुरू करून औद्योगिक वसाहतीमधील पदार्पण केले. प्लॅस्टिक मोल्डिंगच्या व्यवसायामध्ये यश संपादन करुन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यामुळे एका सामाजिक जाणिवेतून आपल्याला जे कष्ट भोगावे लागले, ते समाजातील इतर कोणत्याही महिलेच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून विविध सामाजिक संघटना व बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम वंदनाताईंनी केले आहे.
याप्रमाणे लहानपणापासूनच अतिशय संघर्षमय जीवन जगलेल्या वंदना पोटे यांना लग्नानंतरही संघर्षमय जीवन जगावे लागले. या संघर्षमय जीवनातूनच त्यांच्यातील उद्योजिका व समाजसेविका घडली असेच म्हणावे लागेल. 6 जून 1975 साली जातेगाव (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील तुकाराम औटी यांच्या पोटी वंदनाताई यांचा जन्म झाला. कोरडवाहू शेतीशिवाय रोजगाराच्या कुठल्याही साधन सुविधा उपलब्ध नसल्याने औटी कुटुंबीयांना फार हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची वेळ आली होती. त्यावरही मात करत तुकाराम औटी यांनी आपल्या मुलांचा यशस्वीरीत्या सांभाळ करत त्यांना शिक्षित व संस्कारित केले.
1992 साली सुरेश पोटे यांच्याशी वंदनाताई यांचा विवाह झाला. विवाहानंतर एक मुलगी होताच पोटे कुटुंबीयांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जातेगाव सोडले. औद्योगिकदृष्ट्या नावारूपाला आलेल्या सणसवाडी (ता. शिरूर) येथे आपला मुक्काम हलवला. अनोळखी ठिकाणी पोटे कुटुंबीयांना झोपडीत राहून आपल्या संसाराचा गाडा हाकायची वेळ आली. एका खासगी कंपनीमध्ये काम करुन नव्या आयुष्याची सुरवात करण्यात आली होती; मात्र थोड्या दिवसात कंपनीने कामावरून काढून टाकले. त्यामुळे वंदनाताईंना आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी धुणी-भांडी करणे. धान्य-कडधान्ये, भाजीपाला विक्री करणे अशा व्यवसायामध्ये आपला जम बसवला. त्याच काळात शिरूर तालुक्यामध्ये जमिनीला नुकतेच सोन्याचे भाव येऊ लागल्याने शिरूरमध्ये औद्योगिकीकरणाचे व हरितक्रांतीचे वारे वाहू लागले. अनेक ठिकाणी जमिनीचे व्यवहार होऊ लागले होते. पुरूषी मक्तेदारी असलेल्या या व्यवसायांमध्ये वंदनाताईंनी आपला मोर्चा वळवला. यात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले.