राजगुरूनगर -येथे चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यात दुचाकीवरून पडून एक युवा उद्योजक बुडाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली असून सायंकाळी उशिरापर्यंत उद्योजकाचा शोध सुरू होता.
पंचशील विठ्ठल फलके (वय 45 रा. राजगुरूनगर) असे बुडालेला उद्योजकाचे नाव आहे. याबाबत स्थानिकांनी दिलेली माहिती अशी की, पंचशील फलके हे पुणे नाशिक महामार्गावरी डाक बंगल्याजवळून चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यावरून दुचाकीने (एमएच 14 ईडी 5939) निघाले होते, त्यावेळी दुचाकीवरून ते कालव्यात पडून वाहून गेले. त्यांची दुचाकी कालव्याच्या कडेला पडली होती. मागून येणाऱ्या नागरिकांना दुचाकीवरील व्यक्ती दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, ही घटना समजताच शहरातील युवकांनी घटनास्थळी जाऊन पाण्यात शोधाशोध केली. त्यांचा फोन लागत नव्हता. शहरातील 20 ते 25 जणांनी कालव्यातील पाण्यात सुमारे दोन किमी शोध घेतला; मात्र त्यांचा शोध लागला नाही.