कोल्हापूर (प्रतिनिधी) – सरपंचांनी लोकसहभागातून गावे समृद्ध करावीत. असे झाल्यास महाराष्ट्र आपोआपच स्वच्छ आणि समृद्ध बनेल, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी मंत्री मुश्रीफ यांनी संवाद साधला. यावेळी गावगाडा चालवताना येणाऱ्या अडचणी पदाधिकाऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर मांडल्या.
मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरू करून सबंध देशाला आदर्श दिला. त्यांचेच नाव या योजनेला दिले आहे. अजून अनेक प्रश्न, अडचणी शिल्लक आहेत, हे प्रश्न आपापल्या गावात लोकसहभागातून सोडवा.
तेरावा वित्त आयोग असेल अथवा चौदावा वित्त आयोग असेल, सरकारने विकास कामासाठी पाठवलेले पैसे तुम्ही वेळेवर का खर्च करत नाही? असा सवालही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केला. राज्य सरकार दर महिन्याला नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन खर्च चालवीत आहे.
मुश्रीफ म्हणाले, करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक कोंडीमुळेच तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व त्यावरील व्याज शासनाकडे घेण्याचा विषय पुढे आला. परंतु, तो खर्च न करता हे पैसे परत ग्रामपंचायतीला द्यावेत यासाठी प्रयत्न करून निर्णय घेऊ.
एक हजार 567 ग्रामपंचायतींचा कार्यकाल 30 जून रोजी संपत आहे. त्यानंतर सप्टेंबरअखेर 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपणार आहे. आठवड्याभरातच बैठक घेऊन प्रशासक नेमणुकीचा ही विषय निकालात काढू, असेही असे मुश्रीफ म्हणाले.