– रघुनंदन भागवत
सध्या भारतीय क्रिकेटची अवस्था “देता किती घेशील दो कराने’ अशी झाली आहे. इतक्या गुणवान व सक्षम खेळाडूंची उधळण झाली आहे की निवड समितीला यातले कुठले मोती वेचायचे व कुठले ठेवायचे ही डोकेदुखी निर्माण झाली आहे. आपण डोकेदुखी कमी होण्यासाठी औषध घेतो; पण क्रिकेटमधील भारतीय निवड समितीची डोकेदुखी अजून वाढावी ही गोष्ट भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. यासाठीच ही डोकेदुखी हवी हवीशी वाटणे स्वाभाविक नाही का?
इंग्लंडचा क्रिकेट संघ भारतात येऊन दाखल झाला आहे. या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर एकदिवसीय तसेच टी-20 मालिका होणार आहेत.
इंग्लंडने श्रीलंकेला श्रीलंकेत 2-0 असे हरवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल. भारतसुद्धा ऑस्ट्रेलियावर मात करून नुकताच परत आला आहे. त्यामुळे तो पण सातव्या अस्मानावर असणार आहे. दोन्ही संघांचे मनोबल उच्च पातळीवर असल्याने सर्व सामने चुरशीने खेळले जातील व प्रेक्षकांना अत्युच्च दर्जाचे क्रिकेट बघायला मिळेल हे निश्चित. चेन्नईला प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नसल्याने “दुधाची तहान ताकावर’ या उक्तीप्रमाणे दूरदर्शनवर सामने बघून प्रत्यक्ष सामने बघण्याचा आनंद मिळवावा लागणार आहे. इंग्लंडचा संघ सर्व अस्त्रशस्त्रांसहित पूर्ण तयारीने भारतात दाखल झाला आहे. एक काळ असा होता की इंग्लंडचा दुय्यम किंवा तिय्यम संघ भारतात पाठवला जायचा. पण आज गोऱ्यांचा सर्वोत्तम संघ भारताशी दोन हात करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व जो रूट कडे असून तो आज कोहलीच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळपत आहे.
ऑस्ट्रेलियासारखाच सर्वोत्तम द्रुतगती मारा अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, आर्चर यांच्या रूपाने इंग्लंडकडे आहे. जोडीला बेन स्टोक्स सारखा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, जो केव्हाही सामन्याला कलाटणी देऊ शकतो, तोही आहे. झॅक क्रोवली, जोस बटलर, डॅन लारेन्स, डॉम सिबली यांची भक्कम मधली फळी जो रूटला साथ देण्यास सज्ज आहे. मोईन अली, जॅक लीच, डॉम बेस हे फिरकी त्रिकुट भारतातील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांचा फायदा उठवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशा वरकरणी परिपूर्ण संघाला तोंड देणे ही भारतासाठी डोकेदुखी ठरेल अशी तुमची समजूत झाली असेल, तर ती अगदीच चुकीची नाही. पण वास्तव काही निराळेच आहे.
आज भारताच्या निवडसमितीपुढे जी डोकेदुखी आहे ती म्हणजे सर्वोत्तम बेंच स्ट्रेंग्थची. भारताने आपला 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ज्या भारताला ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन कसोटीत 11 तंदुरुस्त खेळाडूंचा संघ उतरवणे मुश्किल झाले होते, त्याच भारताला इंग्लंडविरुद्ध कोणाला खेळवावे व कोणाला वगळावे, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रथम आपण गोलंदाजीचा तिढा समजावून घेऊ. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झालेले शमी, उमेश यादव व रवींद्र जडेजा हे या मालिकेत उपलब्ध होणार नाहीत. शमीच्या जागी आलेल्या सिराजने आपल्या कामगिरीने संघातली आपली जागा सध्या तरी पक्की केलेली आहे. जसप्रीत बुमराह पूर्ण तंदुरुस्त असल्यास भारत आपले हे ब्रह्मास्त्र इंग्लंडवर डागण्यास अतिउत्सुक असणार यात शंका नाही. हार्दिक पंड्याचा संघात समावेश असल्याने तो आपली तिसऱ्या मध्यमगती गोलंदाजांची गरज भागवू शकतो. या स्थितीत दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौरा हुकलेला अनुभवी ईशांत शर्मा आणि ब्रिस्बेन कसोटी गाजवणारा नवोदित शार्दूल ठाकूर यांना संघात जागा मिळणे दुरापास्त दिसते.
फिरकी गोलंदाजीबाबतसुद्धा तशीच अवस्था आहे. अश्विन तंदुरुस्त असल्यास चेन्नईच्या खेळपट्टीवर तो आपला हुकमाचा एक्का असणार आहे.त्याच्या साथीला कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल यांच्यापैकी कोणाला खेळवायचे हा जटिल प्रश्न भारताला भेडसावणार आहे. इंग्लंडचे फलंदाज लेगस्पिन विरुद्ध चाचपडतात हा पूर्वानुभव लक्षात घेता कुलदीप यादवचा अंतिम 11 खेळाडूत समावेश होण्याची अधिक शक्यता आहे. या स्थितीत ब्रिस्बेनला चमकदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला राखीव खेळाडूत बसावे लागेल. अक्षर पटेल हासुद्धा जडेजाचा पर्याय म्हणून प्रबळ दावेदार ठरू शकतो.
भारत सध्याच्या रणनीतीनुसार पाच गोलंदाज घेऊन खेळण्याची शक्यता अधिक दिसते. हार्दिक पंड्यामुळे भारताकडे तीन वेगवान गोलंदाज असतील तर अश्विन आणि कुलदीप हे फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. फलंदाजीमध्येसुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे मयांक अगरवालला संघातील स्थान गमवावे लागणार आहे. बाकी रोहित शर्मा, शुभमान गिल, पुजारा, राहणे, पंत, हार्दिक पंड्या यांचे संघातील स्थान पक्के आहे. लोकेश राहुलसारख्या प्रतिभावंत खेळाडूला या संघात जागा मिळू शकत नाही.
पूर्वी भारताला तेंडुलकर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण यांना पर्याय शोधून सापडत नव्हते तर आता शमी, उमेश यादव, जडेजा यांना एवढे पर्याय उपलब्ध आहेत की त्यांना पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दुखापत हा त्यांच्यासाठी शाप ठरतो की काय असे वाटते.