– अमित डोंगरे
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, असे म्हटले जाते. आजच्या काळात पाहिले तर राहुल द्रविडसारखे बोटांवर मोजता येतील इतकेच सभ्य या खेळात राहिले आहेत. बाकीच्यांचा आचरटपणा आपण जवळपास अनेक सामन्यांमध्ये पाहतो. राजकारणात दुसऱ्याचे श्रेय लाटण्याचे प्रकार होतात मात्र, क्रिकेटमध्ये निदान द्रविडच्या बाबतीत तरी हे खोटे ठरले आहे.
भारतीय संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत 2-1 असे पराभूत करत इतिहास घडवला. या मालिकेत भारतीय संघाचे प्रमुख 10 खेळाडू दुखापतीमुळे खेळले नव्हते. त्यांच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तयार झालेला भारताचा सेकंड बेंच खेळला होता. या संघाला अकादमीचे संचालक द्रविड यांचा परिसस्पर्श झाला होता. कामगिरी जरी खेळाडूंनी केली असली तरी त्यामागची प्रेरणा द्रविडच होता, हे नाकारता येणार नाही.
द्रविडने अकादमीचा संचालक म्हणून जेव्हापासून काम पाहण्यास प्रारंभ केला तेव्हापासून भारतीय संघाला विशेषतः गेल्या पाच वर्षांत सातत्याने अफलातून खेळाडू मिळाले आहेत, हे कोणीच नाकारणार नाही. इशान किशन, शुभमन गील, महंमद सिराज, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हनुमा विहारी, मयंक आग्रवाल, पृथ्वी शॉ, टी. नटराजन, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर हे अनेक खेळाडू द्रविडच्याच तालमीत तयार झाले. यातील अय्यर वगळता बाकी सगळ्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाकडून नेत्रदीपक कामगिरी करण्याची संधी मिळाली व त्यांनीही ही संधी दवडली नाही.
ऍडलेडला जेव्हा पहिली कसोटी भारतीय संघाने मानहानीकारकरीत्या गमावली तेव्हा तर रान उठले होते. संघातील अनेक खेळाडूंची हकालपट्टी करा अशीही मागणी होत होती. जसे एखाद्या विरोधी पक्षाकडून सातत्याने सत्ताधारी नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी होते ना अगदी तशीच! पण संघ व्यवस्थापन, निवड समती, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व बदली कर्णधार अजिंक्य रहाणे या सगळ्यांचा संघातील सेकंड बेंचवर गाढ विश्वास होता.
पहिल्या कसोटीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी परतल्यानंतर नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले व त्याने चमत्कार घडला. त्यानंतर रहाणेच्या शतकासह अन्य खेळाडूंनी केलेल्या जबाबदार खेळाच्या जोरावर आपण हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली. त्यानंतर खरा चित्रपट सिडनीला सुरू झाला. भारतीय संघ हा सामना गमावणार असेच चित्र दिसून येत असतानाच चेतेश्वर पुजारा, शुभमन गील यांनी पहिल्या डावात सरस कामगिरी केली. त्यानंतर भारताच्या नवोदित गोलंदाजांनी यजमानांना अडचणीत आणले व त्यानंतर पुन्हा एकदा पुजारासह रोहित शर्मा व ऋषभ पंत यांनी अफलातून फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला.
रहाणेच्या मेलबर्नवरील शतकामुळेच संघाला प्रेरणा मिळाली व त्यानंतर ब्रिस्बेनला क्लायमॅक्स झाला. हा सामनाही भारताला कठीण होता. पुन्हा एकदा पुजारा, पंत व गील यांनी तडफदार फलंदाजी केली व आश्चर्यकारकरीत्या सामना तर जिंकलाच पण मालिकाही खिशात टाकली. हा इतिहास घडला होता. दोन वर्षांनी याची पुनरावृत्ती झाली होती.
या विजयासाठी संघातील सर्व नवोदित खेळाडूंना द्रविडचे मार्गदर्शन लाभले असल्याने त्याच्या कौतुकाचे पूल बांधले जाऊ लागले. मात्र, आधुनिक क्रिकेटमधील या खऱ्या सभ्य गृहस्थाने हे श्रेय नाकारले व संघातील नवोदितांनीच हा विजय साकार केल्याचे सांगत आपण का, महान ठरतो याचा दाखला दिला. हे खरेतर भारतीय मानसिकतेत बसत नाही. इतरांच्या कामाचे श्रेय लाटण्याची वृत्ती असलेल्या आपल्या देशात द्रविडसारखा सभ्य गृहस्थ आहे तोवर भारताचा सेकंड बेंच असाच तयार होत राहील व देशाला नवनवीन विक्रम साकारून देईल याचा विश्वास वाटतो.