सातारा – सातारा एमआयडीसी पश्चिम महाराष्ट्रातील गोल्डन ट्रॅंगलमधील उत्कृष्ट एमआयडीसी आहे. मात्र, 47 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या औद्योगिक वसाहतीला आज मंदीचे ग्रहण लागले आहे. पंडित ऑटोमोटिव्ह जागेचा बेकायदेशीर लिलाव देणाऱ्या व घेणाऱ्यांना कामगार उध्वस्त करायचा आहे काय, लोकप्रतिनिधी असाल म्हणून टाळूवरचे लोणी खाणार काय, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
साताऱ्यात पंडित ऑटोमोटिव्हच्या पाचशेहून अधिक कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सध्या गाजतो आहे. या कंपनीच्या जागेचा लिलाव आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी या वादात उडी घेत “कामगार चळवळ चिरडाल तर खबरदार गाठ माझ्याशी आहे,’ असा अल्टिमेटम दिला.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या दर्शनी भागात सर्व कामगारांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जी जागा तब्बल 42 कोटी रुपयांची आहे, त्या जागेचा लिलाव संबंधितांनी फक्त आठ कोटीमध्ये घेतला, म्हणजे एमआयडीसीचे अधिकारी, संबंधित बॅंक व लिलाव घेणाऱ्यांचे संगनमत दिसून येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 1974 मध्ये सातारा एमआयडीसीची स्थापना झाली. गेल्या 47 वर्षांत या एमआयडीसीत कोणाची एकाधिकारशाही फोफावली हे उघड सत्य आहे.
आम्ही बोलायला गेलो तर आमच्यावर खंडणीचे गुन्हे टाकायचे, असे सांगून उदयनराजे म्हणाले, “”पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या कामगारांना आणि त्यांच्या अस्तित्वाला कोणी चिरडू शकत नाही. तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून टाळूवरचे लोणी खायचा अधिकार मिळाला काय, कामगारांचे आयुष्य उद्वस्त करण्याचा अधिकार कोणालाच नाही.” त्यांच्या वेदना समजून घ्यायला हृदय लागतं आणि ते संबंधितांकडे नाही असा आरोप उदयनराजे यांनी केला.
कामगारांना न्याय देणार : उदयनराजे
या प्रश्नात शासकीय यंत्रणा म्हणून लक्ष घालावे आणि सखोल चौकशी करावी, अशी विनंती उदयनराजे भोसले यांनी कामगार आयुक्त, एमआयडीसी अधिकारी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना हात जोडून केली. येत्या 11 फेब्रुवारी रोजी मी साताऱ्यात परतल्यानंतर सातारा एमआयडीसीतील आजारी उद्योग किती आहेत आणि आठ कोटीत लिलाव देणाऱ्या बॅंकेला आम्ही सोळा कोटीचे ग्राहक देतो. ती जागा कोणाला हस्तांतरित करू नये तसेच कामगारांच्या वकिलांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी करावी, अशा सूचना उदयनराजे भोसले यांनी दिल्या. मी संपूर्णपणे कामगारांच्या बाजूने असून त्यांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.