नवी दिल्ली – कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. यामध्ये आजार किंवा औद्योगिक दुर्घटना झाल्यास कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरकारी रुग्णालयाच्या निर्मितीवेळी एक महिला जखमी झाली होती, तिला 9.30 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देताना न्यायालयाने वरील टिप्पणी केली आहे.
अपघातावेळी पीडितेला आलेले अपंगत्व लक्षात घेत पीडितांना नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे, असे न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्या. एस रवींद्र भट यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. कोणतीही आर्थिक अथवा वस्तुरुपातील मदत कोणत्याही गंभीर दुर्घटनेमुळे आलेल्या पीडितेच्या दुःखाला कमी करू शकत नाही. आर्थिक मदत ही कायद्यातील एक तरतूद आहे, ज्यामुळे पीडित अपंग व्यक्तीला जगण्यासाठी मदत होऊ शकेल.
22 जुलै 2015 रोजी एक महिला सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. तेव्हा सेंटरिंग प्लेट तिच्यावर डोक्यावर आदळले. यामुळे तिच्या पाठीच्या कणाला दुखापत झाली. तसेच शरीरातील अनेक अवयव फ्रॅक्चर झाले. संबंधित महिला आयुष्यभरासाठी विकलांग झाल्याने तिला तिच्या उदरनिर्वाहासाठी नुकसानभरपाई मिळायला हवी, असे न्यायालायने म्हटले आहे.
कर्तव्यावर असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात, ज्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला अपंगत्व आले किंवा मृत झाल्यास नुकसान भरपाई मिळायला हवी. अपंगत्व आल्यामुळे संबंधित कर्मचारी पूर्वीप्रमाणे काम करू शकणार नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार. यामुळे कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी, असे न्यायालायने नमूद केले.