उदयपूर – राजस्थानात शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी 55 जणांना अटक केली आहे. यामध्ये 7 महिलांचाही समावेश आहे. या शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेचे पेपरफुटीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही परीक्षा शनिवारी होणार होती. मात्र पेपरफुटीमुळे ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.
शिक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी उदयपूरमधील सुखेर पोलीस ठाण्यात आणि बेकारीया पोलीस ठाण्यात अशी दोन प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. या संदर्भात 55 जणांना अटक करण्यात आल्याचे उदयपूरचे पोलीस अधिक्षक विकास शर्मा यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून त्यापैकी 7 महिलांना 7 दिवसांची पोलीस कोठडी आणि उर्वरित सर्वांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश ढाका असून तो फरार आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. शनिवारी परीक्षेच्या पूर्वी काही तास आगोदर पेपर फुटल्याचे उघड झाल्यावर 37 विद्यार्थी आणि 7 तज्ज्ञांना अटक करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पेपर सुरेश विष्णोई याने उपलब्ध करून दिले होते. विष्णोईला हे पेपर सुरेश ढाका याने उपलब्ध करून दिले होते, असे चौकशीदरम्यान उघड झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
परीक्षेला जाणारे विद्यार्थी ज्या बसमधून परीक्षा केंद्रांवर जात होते, तेथेच बसून तज्ज्ञांच्या मदतीने हे पेपर सोडवत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी ही बस बेकारीया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असताना पकडून पेपर सोडवणाऱ्या उमेदवारांना ताब्यात घेतले होते.