वाहनधारकांचा प्रवास झालायं धोकादायक, दुरुस्तीकडे दुर्लक्ष
मायणी – मल्हारपेठ पंढरपूर राज्य मार्गावरील मायणी म्हासुर्णे या दहा किलोमीटरच्या अंतरावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे तर अनेक ठिकाणी डांबर एक फुटापेक्षाही कमी शिल्लक राहिले आहे. खड्ड्यांची खोली ही फुटापेक्षा जास्त झाली असल्यामुळे या मार्गावर किरकोळ अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
सातारा-सांगली-सोलापूर जिल्ह्यातून जाणारा मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गाचे मायणी पासून पंढरपूरकडे जाणाऱ्या सुमारे नव्वद किलोमीटर मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र या उलट स्थिती मल्हार पेठेकडे जाणाऱ्या मार्गाची आहे. मायणी म्हासुर्णे मार्ग खड्डेमय झाला आहे. या मार्गावर यलमर वस्ती, पवारमळा, गुंडेवाडी फाटा मोहिते मळा तसेच पुनर्वसन गावठाण आधी ठिकाणी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांची खोली आता एक फुटापेक्षाही अधिक झालेली आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साठल्यामुळे वाहनचालकांना खड्डा किती खोल आहे याचा अंदाज नसल्याने अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. गुंडेवाडी फाटा या ठिकाणी राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे एक फुटापेक्षाही अधिक खोलीचे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची रुंदी आणि लांबी वाढल्याने वाहने खड्ड्यात अडकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. तसेच पवार मळा व पुनर्वसन गावठाण या ठिकाणी राज्य मार्गाचीदेखील अशीच परिस्थिती झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.