कोल्हापूर – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नजिक असणाऱ्या मुदतबाह्य किणी टोल नाक्यावर आज मनसेकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मनसेनं आक्रमक भूमिका घेता किणी टोल नाक्यावरील वसूली बंद करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान किणी टोल नाक्यावर आज त्याचे पडसाद उमटले. गेल्या काही दिवसांपासून हा टोल नाका चर्चेत असून मुदत संपूनही वसुली सुरू असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे काही दिवसांपूर्वी याच किणी टोल नाक्यावर मनसेकडून या संदर्भात आंदोलन करण्यात आले होते. आज पुन्हा आंदोलन करण्यात आले. टोल नाक्यावरील वसुली बंद करण्यात यावी या मागणी साठी बेंड बाजा वाजवत आणि कलश पूजन करत अनोख्या पद्धतीने आंदोलन मनसेकडून करण्यात आले.
मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर दुसरीकडे पोलिसांनी कायदा व संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त ही तैनात केला होता.