पुणे –अकरावीच्या पहिली गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि.30) शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत जवळपास 19 हजार 362 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी दि. 27 ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती. यात 38 हजार 858 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. यातील पहिली पसंतीचे महाविद्यालय निवडलेल्या 22 हजार 665 विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश मिळूनही प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिवसाची मुदत आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिली पसंतीक्रम वगळता अन्य महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, त्यांनी वेळेत प्रवेश निश्चित करावा.
अथवा पुढच्या फेरीची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र एकदा प्रवेश निश्चित केल्यानंतर पुढच्या फेरीत त्याचा विचार होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, प्रवेशाची दुसरी फेरीची प्रक्रिया 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.