मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली आहे. त्यामुळे सर्वत्र शेतातील पिकांना पाण्याची अवश्यकता आहे. त्यातच वीजबिलाच्या थकबाकीमुळे विद्युत महामंडळ वीज खंडीत करण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत भाजपकडून वीज विभागाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावरून उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल भरावच लागेल, असंही म्हटलं.
उर्जामंत्री राऊत म्हणाले की, वीज फुकटात तयार होत नाही. त्यासाठी कोळसा लागतो, पैसा लागतो, कर्ज काढावं लागतं, ते आणायचं कुठून ? त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरावचं लागेल. फार तर शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान भाजपने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना फुकट वीजेची सवय लावून अडचण निर्माण केली आहे. महावितरणवर 56 कोटींचा बोजा आहे. वीज वापरतात, मग वीज बिल भरायला नको का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी राऊत यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने अव्वाच्या सव्वा इंधन दरवाढ केली. त्यानंतर थोडीशी कपात करून सामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केल्याचा आरोप राऊत यांनी केली.