नाशिक – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले आहे. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडले. नवाब मलिक मुस्लीम आरक्षणावर बोलत नाहीत. केवळ एका बोलघेवड्या मंत्र्यामुळे ओबीसी आरक्षण गेले, असा हल्लाबोल शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला.
नाशिक येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचे आणि अपशकुनी आहे. हे सरकार कोणत्या मुहूर्तावर आले माहित नाही. मात्र, यामुळे लोक देशोधडीला लागले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
विनायक मेटे म्हणाले, दोन वर्षांतील आघाडी सरकारने केलेली कामे कोणालाही सांगता येणार नाहीत. करोना काळात सरकारमुळे लोक देशोधडीला लागले ही यांची उपलब्धी आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार कोणत्या मुहूर्तावर आले माहिती नाही. मात्र, सरकार आल्यापासून राज्यात संकट आहे. हे पालथ्या पायाचे अपशकुनी सरकार असल्याने ही वेळ आली आहे.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकार केले आहे. कर्जमुक्ती करू असे सांगितले. मात्र, असे काही झाले नाही. सरकार आणि विमा कंपन्यांचे साटलोटे आहे. शेतकऱ्यांचा मात्र तोटा होत आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.