बारामती -करोना काळात जोखीम पत्करुन अखंडित वीजपुरवठा करुनही ग्राहकांनी थकबाकीसह सुरू वीजबिल भरण्यास चालढकल केल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट आहे. महावितरणने कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना अल्टीमेटम देत वीजबिल भरण्याचे आवाहन केले. तरीही कृषीपंपाची 6 हजार 775 कोटींची थकबाकी आहे.
या कालावधीत महावितरणने 425 कोटींची वसुली केली आहे. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत. त्यामुळे वीज वसुलीचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके आणि सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात एकूण 26 लाख 56 हजार वीज ग्राहक आहेत. त्यातील 7 लाख 35 हजार 512 हे कृषीपंपाचे आहेत. सप्टेंबर 2020 अखेर सर्व शेतकऱ्यांकडे मिळून 8 हजार 142 कोटींची थकबाकी होती.
दरम्यान, राज्य शासनाने कृषी धोरणांतर्गत 2221 कोटी निर्लेखित करुन सुधारित थकबाकी 5 हजार 920 कोटी इतकी निश्चित झाली. कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम व सप्टेंबर 2020 पासूनचे चालू बिल भरले तर उर्वरित 50 टक्के थकबाकी माफ होऊन शेतकऱ्यांना जवळपास 66 टक्क्यांची माफी मिळते.
शिवाय भरणा झालेल्या रकमेतून 33 टक्के गावपातळीवर व 33 टक्के जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत कामावरच खर्च होणार आहे. दरम्यान, एकूण शेतकरी ग्राहकांच्या तुलनेत केवळ 10.42 टक्के (76689) शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत 125 कोटींची थेट माफी मिळवली आहे. सर्व शेतकऱ्यांना महावितरणने थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी अंशत: रक्कम भरली आहे, अशा शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम तातडीने भरावी लागणार आहे. ज्यांनी आजवर योजनेचा लाभच घेतलेला नाही, त्यांनाही देय रक्कम भरावी लागेल, अन्यथा महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.
नऊ लाख ग्राहकांची 1338 कोटी थकबाकी
बारामती परिमंडलात शेतीवगळून असलेल्या ग्राहकांमध्येही थकबाकीचे प्रमाण वाढलेले आहे. अशा विविध वर्गवारीतील 9 लाख 42 हजार 783 ग्राहकांकडे 1338 कोटी 62 लाख रुपये थकले आहेत. यामध्ये घरगुतीचे 8 लाख 10 हजार ग्राहक असून त्यांच्याकडे 183 कोटी रुपये थकीत आहेत.
साचलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली आहेत. सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम सुरु राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली जाणार आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे.