नवीदिल्ली – जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका पूर्ण पारदर्शकतेने घेतल्या जातील असा आशावाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. फक्त निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथील जाहीर सभेत शाह यांनी ही माहिती दिली. नरेंद्र मोदी सरकार देशाच्या या भागातून दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करेल, असेही ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही, यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी भर दिला. केंद्रशासित प्रदेशाच्या 3 दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अमित शहा यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेतृत्वावर ‘अब्दुल्ला अँड सन्स’, ‘महबूबा अँड कंपनी’ असं म्हणत जोरदार निशाणा साधला.
अमित शाह म्हणाले, ‘असे काही लोक आहेत ज्यांनी गेली 70 वर्षे राज्य केले आणि आता मला पाकिस्तानशी बोलण्याचा सल्ला देतात. पण या विषयावर माझा दृष्टिकोन स्पष्ट आहे. मला पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे बोलायचे नाही, मला जम्मू-काश्मीरच्या लोकांशी संवाद साधायचा आहे. निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा आहे. यानंतर येथे निवडणुका होणार असून जम्मू-काश्मीरच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच येथे सरकार चालवतील.