मुंबई – भारतीय जनता पक्षाने चित्रा वाघ यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवासांपासून त्या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. याआधी उमा खापरे यांनी भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी काम केले आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेऊन तत्कालिन महाविकास आघाडीचे मंत्री संजय राठोड यांना वेठीस धरले होते. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. मात्र पोलीस तपासानंतर राठोड यांना क्लिनचीट मिळाली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही चित्रा वाघ यांनी विरोध दर्शविला होता.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी येथील गोपीनाथगड पांगरी गावाची सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला असून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गटाचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे.