नवी दिल्ली : कोरोना आणि अतिमुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने, ‘अद्याप निवडणूक आयोगाने तारिख जाहीर केली नसून निवडणुकांसंदर्भातील अधिसूचनाही जारी केलेल्या नाहीत. निवडणूक आयोग परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे.
अविनाश ठाकूर यांनी बिहार निवडणूका रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की, कोरोना आणि पुरस्थिती यांमुळे बिरामध्ये निवडणूकांसाठी योग्य परिस्थिती नाही.’ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकांची अधिसूचना जारी होण्याआधीच निवडणूका रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत, त्यावर सुनावणी करता येणार नसल्याचे सांगितले आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. तसेच याचवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. ज्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती की, जोपर्यंत बिहारमधील कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच पुरस्थितीचा धोका टळत नाही. तोपर्यंत विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बिहार निवडणुका घेण्यास हिरवा कंदिल दाखवत सांगितले की, कोरोना कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुका रोखण्यासाठी मोठं कारण असू शकत नाही.
दरम्यान, दरवर्षाप्रमाणे यावर्षीही बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखो लोकांवर याचा परिणाम झाला आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बिहारमधील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारत जगभरातील सर्वात जास्त कोरोना बाधितांची संख्या असणाऱ्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सर्वाधिक कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा असणाऱ्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच जगभरातील भारत असा तिसरा देश आहे, जिथे कोरोनाचे सर्वाधित अॅक्टिवह रुग्ण आहेत.