Eknath Shinde । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये. महायुतीकडून सर्वात पहिले भाजप पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर शिंदे गट, अजित पवार गट नेत्यांकडून जागावाटपाच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात महायुती सरकार आहे, अशात जागावाटपानंतर शिंदे गट, अजित पवार गट आणि राजकीय गणिते ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलतांना दिसत आहे.
शिंदे गटातील आमदार खासदार जागावाटपावरून नाराज असून काही मतदार संघात यावरून संघर्ष पाहायला मिळत आहे. अशात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि उपनेत्यांची बैठक पार पडली. मुंबईत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना तिकीट मिळण्याबद्दल महत्त्वाचा मेसेज दिला.
वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे म्हणाले,’येत्या निवडणुका खरी परीक्षा आहे. आमदार म्हणून जितका लीड द्याल ते तुमचं प्रगती पुस्तक असेल. पुढचं तिकीट मिळेल की नाही, हे त्यावरून ठरेल. आमदार जिल्हाप्रमुखांची पदाधिकाऱ्यांची ही खरी टेस्ट आहे’, असा स्पष्ट मेसेज एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह पदाधिकाऱ्यांना दिला.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांचा सूचक इशारा
‘मी कितीही बिझी असलो, तरी प्रत्येक तालुक्याची खबर माझ्याकडे येते. मला कुणी फसवू शकत नाही. फसवू पण नका, सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे”, असा सूचक इशाराही शिंदेंनी यावेळी नेत्यांना दिला.
ते पुढे म्हणाले,’पक्षाची शिस्त कुणीही बिघडू नका, मी पण बिघडणार नाही. इथे कुणी नोकर नाही. आपण सगळे मालक आहोत. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, हे आपल्याला घरघडी समजायचे.’
शिंदे गटात,’राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. कार्यकर्ते जीवाचं रान करून आपल्याला निवडून आणतात. निवडणूक संपल्यानंतर आपण त्यांना विसरतो. कार्यकर्त्यांच्या संकटात उभं रहा त्यांना वाऱ्यावर सोडू नका.’ असेही एकनाथ यावेळी म्हणाले.