सातारा -शहरातील सदरबझार परिसरातील लक्ष्मी टेकडी भागात करोनाचा संसर्ग वाढतच असून बुधवारी रात्री आलेल्या अहवालात लक्ष्मी टेकडीसह सातारा शहरात 12 व तालुक्यात 22 असे 34 रुग्ण आढळून आले. आरोग्य यंत्रणेने लक्ष्मी टेकडी परिसरात दीडशे नागरिकांच्या स्त्रावाचे नमुने स्वॅब घेतले आहेत. दरम्यान, जीवनावश्यक सुविधा मिळत नसल्याची लक्ष्मीटेकडी येथील नागरिकांची तक्रार आहे.
लक्ष्मी टेकडी परिसरात आज आठ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यात सहा महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. याशिवाय सदरबझार येथे 30 वर्षीय महिला तर शनिवार पेठेतील श्रीराम अपार्टमेंटमध्ये एक महिला व एक दहा वर्षाचा मुलगा बाधित आढळला आला असून यादोगोपाळ पेठेतील 62 वर्षीय वृध्देला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा तालुक्यात लिंब येथे आठ करोनाबाधित आढळले असून यामध्ये तीन महिला व पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शेळकेवाडी येथे करोनाची साखळी सुरूच असून तेथे पाच जणांना बाधा झाली आहे.
करंडी येथे 50 वर्षीय महिला तर संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीत 41 वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. काशीळ येथे 36 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथे एक दाम्पत्य, सोनापूर नागठाणे येथे तीन महिला व एक पुरूष व कामथे येथील 40 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे आढळले. तालुका आरोग्य पथकाने रोजचे 250 स्त्रावांच्या नमुन्यांचे उद्दिष्ट ठेवल्याने ही संख्या वाढल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. पवार यांनी सांगितले. बाधितांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.
यामध्ये लहान मुलांची संख्या अचानक वाढल्याने पालक काळजीत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार सातारा शहरात बारा व तालुक्यात बावीस असे चौतीस रूग्ण आढळून आले. सातारा पंचायत समिती व सातारा नगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणांनी लक्ष्मी टेकडी परिसरातील करोनाची साखळी तोडण्याचे आव्हान स्वीकारले आहे.
मुख्याधिकारी रंजना गगे यांनी या भागाचा दौरा करून नागरिकांचे प्रबोधन केले. येथील समाजमंदिर वडार वस्तीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून स्त्राव तपासणीची मोहिम सुरू आहे. या मोहिमेत 24 तासांपूर्वी पाठवण्यात आलेल्या 42 नमुन्यांमध्ये पहिल्या दिवशी 13 तर बुधवारी रात्रीच्या अहवालात आठ जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
येथील वडार वस्ती परिसरात कंटेनमेंट झोन असूनही डिस्टन्सिंग न पाळता रंगणारे गप्पांचे फड ही खरी अडचण आहे. बाधित महिला श्रमिक मजूर आहेत. तपासणीला नकार दिला जात आहे. याशिवाय परिसरात तुंबलेली गटारे, डुकरांचा वावर, अपुरी जंतुनाशक फवारणी व भाजी, दूध, किराणा सुविधांची वानवा असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात 95 जणांचे नमुने घेण्यात आले.