नवी दिल्ली, दि. 22 – स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये शेकडो आयुध कारखाने होते. दोन्ही महायुद्धांच्या काळामध्ये भारतामधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्यात झाली आहे. हीच व्यवस्था स्वातंत्र्यानंतर मात्र म्हणावी तितकी बळकट केली गेली नाही, याला अनेक कारणे आहेत, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीविषयी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये आज मार्गदर्शन केले. देशाच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनविण्याच्या महत्वपूर्ण विषयावर या वेबिनारमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात आल्यामुळे त्याचे विशेष महत्व आहे, असे पंतप्रधान यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.
आपल्या सरकारला आपल्याकडे कार्यरत असलेले अभियंते आणि संरक्षण विषयक संशोधनकार्य करणा-यांच्या क्षमतेवर पूर्ण भरवसा आहे. त्यांनी विकसित केलेल्या तेजस लढाऊ विमाने आज अतिशय शानदारपणे आकाशात विहार करीत आहेत. काही आठवड्यांपूर्वीच तेजससाठी 48,000 कोटींची मागणी नोंदविण्यात आली आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, 2014 पासून संरक्षण क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणण्यात आली आहे, तसेच योग्य अंदाज घेऊन उद्योग सुलभतेसह पुढची वाटचाल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने परवाने देणे आणि नियमनामध्ये शिथिलता आणली आहे तसेच निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. या क्षेत्रात परदेशी गुंतवणूकीसाठी उदारीकरणाचे धारेण आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत.
भारताने संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्वाच्या 100 उत्पादनांची सूची तयार केली असून त्यांची निर्मिती स्वदेशी स्थानिक उद्योजकांच्या मदतीने करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. यासाठी समय सीमा निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे आपल्या उद्योगांना संरक्षण क्षेत्राची गरज पूर्ण करू शकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
“एमएसएमई’ उत्पादन क्षेत्राचा कणा
एमएसएमई संपूर्ण उत्पादन क्षेत्राचा कणा आहे, हे लक्षात घेऊन एमएसएमईमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे आणि उद्योजकांना दिलेल्या स्वातंत्र्यामुळे त्यांना आपल्या व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आज देशामध्ये संरक्षण कॉरिडॉर बनविण्यात येत असल्यामुळे माध्यमातून स्थानिक उद्योजक आणि स्थानिक उत्पादनाला मदत होत आहे. आपले संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर होत असतानाच जवान आणि युवक या दोन आघाड्यांचे सशक्तीकरण कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.