- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविणार : नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये 900 रुग्णांची भर पडली असून तब्बल 3100 हून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. शहरातील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. सध्या काही निर्बंध घालण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती आटोक्यात न आल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
करोनाची वाढती संख्या पाहता प्रशासनाने उपायायोजना सुरु केली आहे. त्यानुसार, शहरामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढविण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासली तर कोविड सेंटर देखील पुन्हा सुरू करण्याचा विचार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी सांगितले.
शहराती करोना आटोक्यात आणण्यासाठी काही बाबींमध्ये कठोरता आणण्यात येणार आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजी सैनिकांना मार्शल्स म्हणून घेणार आहे. त्यांच्या माध्यमातून अशा नागरिकांवर कारवाई करण्यात येणर आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर बारकाईने नजर ठेवून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये करोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायजर, सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे. तसेच प्रशासनाला सहर्काय करणे.
संक्रमण दर दुपटीने वाढता
आयुक्त पाटील म्हणाले, पूर्वी संक्रमण दर हा 5 ते 7 होता. तो वाढून 10 ते 11 झाला. अर्थात शंभर नागरिकांची चाचणी केल्यानंतर पाच ते सात जणांना लागण झाल्याचे आढळून येत होते. परंतु आता हा आकडा दहाच्या वर गेला आहे. दोन दिवसांपूर्वी तर हा आकडा 23 च्या जवळ गेला होता. त्यानुसार काही प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीच्या निर्देशानुसार शहरात काही निर्बंध लागू करण्यात आले आहे आहे.
सद्यस्थितीत रोज दोन हजार चाचण्या
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि चाचण्या वाढविण्यात येणार आहे. सदस्यस्थितीत चाचण्या 2 हजार होत आहेत. त्या पुढील आठवड्यामध्ये तीन हजारपर्यंत करण्यात येणार आहे. ज्यावेळी शहरामध्ये करोनाचा सर्वाधिक पीक होता. त्यावेळी शहरामध्ये 4 हजार 700 बेडची आवश्यकता होती. ती सोय आपल्याकडे आता उपलब्ध आहे.
कोणत्याही क्षणी ते आपल्याला सुरू करता येतील. दरम्यानच्या काळात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे करोना सेंटर बंद करण्यात आले होते. तसेच मनुष्यबळ कमी केले होते. मात्र पुढील चार पाच दिवसांची परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात येईल. मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांना ठराविक कालावधीसाठी मानधनावर घेण्याच्या विचारात प्रशासन असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.
काही निर्बंध शहरामध्ये 28 ताऱखेपर्यंत लागू आहे. त्यानंतर लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. पुढील काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर लॉकडाऊनची परिस्थिती ओढावू शकतो. अशी परिस्थिती येऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करावे.
– राजेश पाटील, आयुक्त.