पुणे – सध्या तरुणी आणि एकूणच तरुणपिढी व्यसनांकडे वळताना दिसत आहे. त्याला कामाच्या वेळा, ताणतणाव कारणीभूत असून, व्यसनांकडे त्यांनी वळू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे एकत्रित मत व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आणि मानसोपचार तज्ज्ञांनी रविवारी व्यक्त केले.
“मन:शक्ती व्यसनमुक्ती केंद्र आणि मनोधर्य वेलनेस सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने “मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती जनजागृती’ या विषयावर कार्यशाळेचे सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत “मन:शक्ती व्यसनमुक्ती केंद्र आणि मनोधर्य वेलनेस सेंटर’ चे संचालक समीप नागवेकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप महामुनी, “माईंड आणि हेल्थ एक्स्पर्ट’ प्रसाद चांदेकर आदींनी मार्गदर्शन केले. याशिवाय या कार्यशाळेला शहरातील व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे मानसोपचार तज्ज्ञ आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते.
सुमारे 15 वर्षांपासून व्यसनमुक्ती आणि अन्य सामाजिक प्रश्नांवर सामाजिक क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. शहरात विविध स्तरावर अनेक मानसोपचार तज्ज्ञ काम करतात. त्या कामामध्ये सुसूत्रता यावी आणि मन:शक्ती आणि मनोधैर्यचे काम लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांना घेऊन काही सामाजिक काम करता यावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे नागवेकर यांनी सांगितले.
आमच्याकडे अनेकजण अनेक समस्या घेऊन येतात. त्या सगळ्यांपर्यंतच आम्हांला प्रत्येकवेळी पोहोचणे शक्य नसते. त्यावेळी आम्हांला या तज्ज्ञांचे सहकार्य मिळू शकते. त्यांच्या मदतीने हे प्रश्न आम्ही सोडवू शकतो, असे नागवेकर यांनी नमूद केले.
करोनानंतर अनेक सामाजिक स्थित्यंतरे झाली. कौटुंबिक परिस्थितीवर परिणाम झाला. त्यातून “वर्क फ्रॉम होम’चे दुष्परिणाम आहेत, मुले घरातच असतात, मोबाइल, इंटरनेट आहेत की जे कमी वेळेत जास्त “बुस्ट’ देण्याचे काम करतात. त्यामुळे याकडे मुले जास्त आकर्षित होतात. त्यांना पर्याय उपलब्ध करून दिला जात नाही. ते ज्या परीघात असतात तेच त्यांना दिसते आहे. त्यांना समजावणारे कोणी नसल्याने ते काम मानसोपचारतज्ज्ञ करतात. त्यांना वेळीच हे मार्गदर्शन मिळाले नाही तर ते भरकटत जाऊन गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. नव्याने व्यसनाधिन होऊ पाहणाऱ्यांना थांबवणे हा देखील आमचा उद्देश्य आहे, असे नागवेकर म्हणाले.
व्यसनमुक्तीच्या दृष्टीने जनजागृती होणे आवश्यक आहे. एक व्यक्ती बरा होणे म्हणजे त्याच्या आजूबाजूची 50 माणसे बरी होणे हा फायदा आहे. मोठी माणसे मोबाइल स्क्रीन चे “ऍडीक्ट’ होत आहेत. लहान मुलेही मोबाइलचे “ऍडीक्ट’ झाले आहेत. “जंगली रमी’ यासारख्या जुगाराचे व्यसन लागले आहे. मोबाइल दिला नाही म्हणून लहान वयाचे मुले आत्महत्या करण्याचे प्रकारही घडले आहेत, हे फार चुकीचे आहे, असे चांदेकर म्हणाले.
आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहे. रुग्णांना आणणे, तीन महिने ठेवणे, त्याची व्यसनमुक्ती करणे, त्याला माहिती देणे, त्याला भविष्यासाठी मार्गदर्शन करणे, त्याच्या कुटुंबियांचे समुपदेशन करणे आणि त्याला घरी पाठवणे हे आमचे कार्य आहे. पुण्यामध्ये आता व्यसनमुक्ती केंद्रात महिलांचे वॉर्ड सुरू झाले आहेत. महिलामध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. त्याची अनेक कारणे आहेत. जे पूर्वी जाणवत नव्हते, असे चांदेकर यांनी नमूद केले.
तरुणी आणि तरुणपिढी व्यसनांकडे वळताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांचे कामाचे स्वरूप, कामाच्या वेळा, कामाच्या ठिकाणी असणारा ताण यामुळे ते विविधप्रकारचे व्यसन करतात. त्यामध्ये धुम्रपानापासून ते लैंगिक व्यसन याचा समावेश होतो. त्याच्यामुळे “व्हर्च्युअल वर्ल्ड’ तयार झाले आहे. घरबसल्या त्यांना कम्युनिकेशन करावे लागते, व्हर्च्युअल जगात ते जास्त असतात.
नको असणाऱ्या व्यक्तीही त्यात येतात. काल्पनिक जगात वावरताना भावनिक गुंतवणूक होते. यामध्ये एखाद्याला मेसेज केला आणि लवकर उत्तर नाही आले तर त्याबद्दल विचार करत राहणे, चिडचिड करणे, डिस्टर्ब होणे, वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करणे हे प्रकार घडतात. वास्तविक नात्यांमध्येच “ऍडीक्शन टू द रिलेशनशिप’ असेच आता दिसू लागले आहे. वास्तव जीवनातल्या नात्यातून व्यक्ती लांब होत चालले आहेत जे होणे अपेक्षित नाही, असे डॉ. महामुनी म्हणाले.