वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी शहीद होणारे भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक खुदीराम बोस यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात 3 डिसेंबर 1889 रोजी झाला. ते सात वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यू झाल्याने त्यांची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.
वर्ष 1902 मध्ये अरबिंदो आणि सिस्टर निवेदिता मिदनापूरला आले असताना त्यांनी स्वातंत्र्यासाठी विद्यमान क्रांतिकारी गटांसाठी व्याख्यानमालिका आयोजित केली. 13 वर्षांचे किशोरवयीन खुदीराम क्रांतीबद्दलच्या चर्चेत सक्रिय सहभागी झाले होते. ते क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीमध्ये सामील झाले आणि कलकत्त्याच्या बरिंद्रकुमार घोष यांच्या कार्याशी जोडले गेले. वयाच्या 15 व्या वर्षी ते क्रियाशील सेनानी झाले. त्यावेळी भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध पत्रिका वाटल्याबद्दल त्यांना प्रथम अटक झाली.
त्यानंतर एक वर्षाने खुदीराम यांनी पोलीस ठाण्यांजवळ बॉम्ब पेरण्यात आणि सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात भाग घेतला. प्रफुल्ल चाकी यांच्यासह खुदीराम यांनी मुझफ्फरपूरला भेट दिली. खुदीराम आणि प्रफुल्ल चाकी यांनी अनुक्रमे हरेन सरकार आणि दिनेशचंद्र रॉय ही नावे धारण केली. धर्मशाळेमध्ये वास्तव्य केले. खुदीराम आणि प्रफुल्ल शाळकरी मुले असल्याचे भासवून त्यांनी किंग्जफोर्ड जेथे वारंवार येत त्या ब्रिटिश क्लबसमोरील पार्कचे निरीक्षण केले.
दुसऱ्याच दिवशी क्लबमधून किंग्सफोर्डच्या घोडागाडीसारखी दिसणारी एक गाडी क्लबमधून बाहेर पडली. गाडी किंग्सफोर्डच्या बंगल्याजवळ येताच खुदीराम आणि प्रफुल्ल यांनी गाडीवर बॉम्ब फेकले. मोठा स्फोट झाला. त्यामध्ये दोन स्त्रिया मृत पावल्या. किंग्सफोर्ड मात्र बचावला. खुदीराम व प्रफुल्ल पोलिसांचे तावडीतून सुटण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने सकाळपर्यंत, वैनी स्टेशन 25 मैल चालत गेले. (सध्या या रेल्वे स्टेशनचे नाव खुदीराम बोस ठेवण्यात आले आहे) त्यांचे धुळीने माखलेले आणि थकलेले पाय तसेच अंगावरील घाम पाहून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी खुदीराम यांना ताब्यात घेतले. अटकेपूर्वी प्रफुल्ल यांनी आत्महत्या केली. खुदीराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 11 ऑगस्ट 1908 रोजी त्यांना फाशी देण्यात आली.