लग्नसराई जोरात सुरू आहे आणि लग्नघरांमधला “आवाज’ वाढतच चाललाय. अर्थात, लग्न वाजतगाजतच झालं पाहिजे, असा आग्रह धरण्याजोगी परिस्थिती आहे हे नाकारता येत नाही. लग्न ठरल्याचा आनंद (विशेषतः मुलाचं) हल्ली युद्ध जिंकल्याच्या आनंदासारखाच आहे. “आजकाल मुली खूप चूझी झाल्यात,’ वगैरे वाक्यं घराघरातून ऐकू येतात.
महानगरं सोडून लहान शहरांमध्ये यायला मुली तयार नाहीत, खेड्यात यायला तयार नाहीत, शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करायला तयार नाहीत, कमी पॅकेजची नोकरी असलेला नवरा त्यांना नको, एकत्र कुटुंब नको… एक ना दोन… असंख्य कारणांमुळे मुलांची लग्नं हल्ली रखडतायत. पण कितीही कारणं सांगितली जात असली तरी मुख्य कारण एकच आहे.
हा काळानं उगवलेला सूड आहे. “मुलगाच हवा’ या अट्टहासापायी आपल्या समाजातलं लिंग गुणोत्तर बिघडत गेलं. आणखी काही वर्षांनी मुलीकडच्यांना हुंडा देण्याची वेळ मुलाकडच्या मंडळींवर येऊ शकते. ही अजिबात अतिशयोक्ती नाही. हा अनुभव आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आपण ज्या देशाचा सातत्यानं पाठलाग केला, त्या चीनमध्ये मुली अशाच “महाग’ झाल्यात. चांगलं शिक्षण आणि नोकरी असलेल्या मुली तर भलत्याच महाग..! हुंडा म्हणून मुलीकडच्यांना द्यावी लागणारी सरासरी रक्कम आजमितीस तब्बल 16 लाखांवर जाऊन पोहोचलीये. हुंड्याला चीनमध्ये “कैली’ म्हणतात. ही कुप्रथा थांबावी यासाठी चीनमधील प्रांतिक सरकारांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतायत.
आपल्याकडे ज्याप्रमाणं वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर सरकारकडून प्रबोधन केलं जातं, तसं चीनमध्ये हुंड्याच्या बाबतीत केलं जातंय. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रचार मोहिमा राबवल्या जातायत. काही ठिकाणी कायदेशीर कारवाईही सुरू आहे. परंतु कारवाई करावीच लागू नये, अशी तजवीज बऱ्याच ठिकाणी केली जातीये. काही प्रांतांमध्ये मुलामुलींच्या आईवडिलांना भेटून संवाद साधला जातो. “आम्ही कैली घेणार नाही,’ असं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातं. कठोर कारवाई शक्यतो टाळण्याचं कारण असं की, चीनच्या “वन चाइल्ड’ धोरणामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे.
आपल्यासारखाच चीनमध्येही “वंशाचा दिवा’ तेवता ठेवण्यावर भर दिला गेला आणि मुलींची संख्या खूपच कमी झाली. त्यातच लग्न न करण्याची मानसिकता तिथल्या मुलींमध्ये झपाट्यानं वाढत गेली. त्यामुळे लग्नासाठी मिन्नतवाऱ्या करण्याची वेळ वरपित्यांवर आली. शांघायच्या एका पार्कमध्ये पूर्वीपासूनच दर शनिवारी भरणाऱ्या “लग्नाच्या आठवडी बाजारा’च्या सुरस कहाण्याही प्रसिद्ध झाल्यात. 2016 च्या आकडेवारीनुसार चीनमध्ये एक हजार पुरुषांमागे अवघ्या 868 महिला होत्या. हीच परिस्थिती कायम राहिल्यामुळे काही वरपिते मुलाच्या लग्नापायी दिवाळखोर झाल्याची उदाहरणं आहेत. मुलाचं स्वतःचं घर असल्याशिवाय मुलगी त्याच्या गळ्यात माळ घालत नाही, त्यामुळे ते टेन्शन वेगळंच!
आपल्याकडे चीनसारखं “वन चाइल्ड’ धोरण नसलं, तरी लोकसंख्येच्या आणि लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आपण चीनचा पाठलाग करत आहोत, हे स्पष्ट झालंय. चीनमध्ये विवाहेच्छू तरुणांची जशी कोंडी झालीये, तशीच जवळजवळ अवस्था आपल्याकडच्या तरुणांची आहे. त्यामुळे “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या न्यायानं आपण काळाची पावलं ओळखलेली बरी! आजमितीस चीनमध्ये नातवंडांपेक्षा आजी-आजोबांची संख्या जास्त आहे, तर आपला देश तरुणांचा आहे. उद्याची स्थिती ओळखून आजच योग्य दिशेने पावलं टाकलेली बरी!