-देवायानी देशपांडे
शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुदृढ व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिकमत्ता! कोविडच्या काळात ही व्याख्या जनसामान्यांपर्यंत पोहोचली. आरोग्यसेवा आणि आरोग्यविमा क्षेत्र या काळात चर्चेत असल्याने सामाजिक-आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. स्वतःकडे, इतरांकडे (कोविडच्या रुग्णाकडे) पाहताना देखील आपण सामाजिक आरोग्याचा विचार अपरिहार्यपणे करतो.
शारीरिक आरोग्याची काळजी आरोग्यसेवा आणि विमा क्षेत्राद्वारे घेतली जात असली तरी कोविड कवच ही खरी आर्थिक गरज होती की मानसिक गरज होती/आहे, हे तपासून पाहणे इष्ट ठरेल. कोविड19 महामारी घोषित झाल्यापासून लोकांवर आरोग्यविषयक माहितीचा भडीमार होत आहे. याचाच छुपा परिणाम म्हणून विमा क्षेत्राची भरभराट झाली आहे का? हा प्रश्न आपण विचारार्थ घ्यावा असा आहे. लोक जागरूक आहेत म्हणून कोविड19 विम्याची निवड करत आहेत की मानसिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी अथवा अनाठायी भयापोटी कदाचित कोविड विम्याची निवड करत असावेत, असे विचारण्यास वाव आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्य अहवालातून पुढे आलेली विमा संदर्भातील माहिती देखील उपरोक्त अंदाजांना पुष्टी देणारी आहे. प्रस्तुत अहवालामध्ये नमूद केल्यानुसार, कुटुंबातील किमान एका सदस्याला आरोग्यविमा कवच आहे अशा कुटुंबांची टक्केवारी (महाराष्ट्रातील) शहरी भागात 20.1 टक्के, ग्रामीण भागात 19.9 टक्के आणि एकूण केवळ 20 टक्के इतकी आहे. इतर राज्यांतील विमासंबंधी टक्केवारीदेखील महाराष्ट्रातील टक्केवारीशी मिळतीजुळतीच आहे. राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्य अहवालातून पुढे आलेली ही माहिती कोविड टाळेबंदीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. मॅक्स या भारतीय विमा कंपनीने कोविड19 नंतर लोकांच्या मानसिकतेमध्ये काही बदल झाला का, हे तपासून पाहण्यासाठी भारतामध्ये एक सर्वेक्षण हाती घेतले. कोविड महामारीपूर्वी आणि महामारीनंतर लोकांच्या मानसिकतेबाबत काही चकित करणारी तथ्ये या सर्वेक्षणातून पुढे आली. कोविडपूर्वी सर्वंकष विमा योजना निवडणाऱ्या आणि निवडू इच्छिणाऱ्या लोकांची संख्या अनुक्रमे 32 टक्के आणि 41 टक्के होती. गेल्या काही महिन्यांमध्ये ही टक्केवारी 55 टक्के आणि 60 टक्के इतकी झाली आहे. प्रस्तुत सर्वेक्षण अहवालाने आणखी एका बाबीवर प्रकाश टाकला आहे.
कोविडपूर्वी आरोग्यावरील वाढता खर्च ही 70 टक्के लोकांसाठी चिंतेची बाब होती. म्हणजे माझ्या घरातील सदस्याला काही झाले तर मी पैशांची तजवीज कशी करू, हा लोकांपुढील प्रश्न होता. कोविडनंतर मात्र 54 टक्के लोकांना कुटुंबाला कोविडपासून सुरक्षित ठेवावे असे वाटते, ही बाब सर्वेक्षणातून पुढे आली आहे. विमा खरेदीच्या प्रवृत्तीमध्ये दिसून येणारा एक महत्त्वाचा बदल म्हणजे त्याचा बदलता कल होय. ऐतिहासिकदृष्ट्या विमा खरेदी ही संस्थात्मक पातळीवर होत असे परंतु, आता व्यवसाय मुख्यत्वे विम्याच्या वैयक्तिक पातळीवरून होणाऱ्या खरेदीतून येत आहे.
संभाव्य विमा खरेदीदारांमध्ये झालेली ही भरघोस वाढ अकल्पित संकटांतून येणाऱ्या जोखमींबद्दलची आर्थिक जाणीव-जागृती आणि पसरलेल्या सामाजिक भय-लहरींचा एकत्र परिपाक आहे, असे म्हणावे लागेल. पैकी, सामाजिक भय हा एकूण सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पैलू असून त्याचा विचार इथे प्रस्तुत आहे. यापूर्वी, स्वाईन फ्लू किंवा स्पॅनिश फ्लू नंतरदेखील अर्थव्यवस्थेवर आणि मनो-सामाजिक पैलूंवर ठळक परिणाम झालेले दिसतात.
प्लेग साथीच्या दरम्यान देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. या अनुषंगाने,जीवघेण्या आजाराच्या साथीचा परिणाम म्हणून पसरणारे सामाजिक भय आणि त्या भयापोटी समाजातून उमटणारी प्रतिक्रिया याचा अधिक सांगोपांग आणि शास्त्रशुद्ध अभ्यास आरोग्यादृष्टीने होणे गरजेचे आहे. भूतकाळात महामारीला प्रतिसाद म्हणून निदर्शनास आलेले कल आणि निर्माण झालेली सामाजिक प्रतिक्रिया भविष्यात सामाजिक आरोग्यासाठी धोरणे आखताना उपयुक्त ठरतील. अधिक सजग, संयत आणि दिग्दर्शित करणे यातून सहज साध्य होईल. यासंदर्भात, बिग डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानाचा फायदा करून घेता येईल.
सामाजिक भयामध्ये वाढ होण्याची कारणे काय असावी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. महामारीच्या काळातील जोखीम त्यासाठी तपासून पाहावयास हवी. वाढते, अनियंत्रित शहरीकरण, शहरांतील लोकसंख्येची घनता आणि प्रवासाच्या लांब अंतरामुळे लांबत जाणारा संपर्क कालावधी यामध्ये कारणे गवसणे शक्य आहे. आरोग्यविषयक किंवा तत्सम कोणत्याही संवेदनशील विषयावरील माहितीची प्रचुरता आणि भडिमार यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या अनुषंगाने, काही निर्देश, नियमनांचा विचार होणे प्राप्त आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे, शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य म्हणजे खरी मत्ता आहे. मात्र, असे असले तरी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य सामाजिक पर्यावरणावर अवलंबून असते. कोविडच्या काळात सामाजिक पर्यावरण बिघडल्याने मानसिक, भावनिकस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी वाढत्या संख्येने विम्याची निवड केली का? हा अभ्यासाचा मुद्दा आहे. “आरोग्याचे समाजशास्त्र’ या विषयाकडे जागतिक संदर्भातून पाहणे ही काळाची गरज ठरते. आरोग्यसेवा व्यवस्थेमध्ये जागतिक पातळीवर बदल होत असल्याने संशोधनात्मक पद्धतीने प्रस्तुत विषयाचा अभ्यास करणे ही काळाची गरज ठरली आहे.
समाज आणि आरोग्यक्षेत्रादरम्यान होणाऱ्या आंतर्क्रियांचा अभ्यास “आरोग्याचे समाजशास्त्र’ या विषयामध्ये केला जातो. सर्वांगीण आरोग्यावर विचार आणि चिंतन करणे या टप्प्याने भाग पाडले. समाजाचे आरोग्य आणि अनारोग्याची बांधणी समाजच करतो. कोविड विमा आणि महामारीच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामांची चर्चा हीच बाब स्पष्ट करणारी आहे.