– माधव विद्वांस
संगीतरचनाकार, गायकनट, साहित्यिक गोविंदराव टेंबे यांची आज जयंती. त्यांचा जन्म सांगवडे, जि. कोल्हापूर येथे 5 जून, 1881 रोजी झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. अनेक भजनी आणि कीर्तनकार मंडळी त्यांच्या घरी निवासाला येत असल्याने गोविंदराव त्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना हजेरी लावत.
भजन-कीर्तनातल्या शब्दांपेक्षा त्यांचे लक्ष हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांमधून उमटणाऱ्या स्वरांकडे असे. या कुतुहलापोटीच ते हार्मोनियम शिकले. त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली होती व सुरुवातीस त्यांनी काही काळ वकिली केली. गोविंदरावांनी तो व्यवसाय सोडून दिला आणि ते नाटक मंडळीत सामील झाले. त्यांनी प्रत्यक्ष वाद्यवादनाचे शिक्षण घेतले नव्हते, मात्र स्वप्रयत्नाने त्यांनी हार्मोनियम वादनात प्रावीण्य मिळवले. गोविंदराव हे भास्करबुवा बखले यांच्या साथीला असायचे आणि बहुतेक वेळा संवादिनीचा एकपात्री प्रयोगही करायचे. उस्ताद बर्कतुल्ला सितारिये यांचे ते गंडाबंद शागीर्द होते.
सुरुवातीस “किर्लोस्कर नाटक मंडळी’त त्यांनी प्रमुख गायकनट म्हणून काम केले. त्यानंतर 1913-15 या दरम्यान “गंधर्व नाटक मंडळी’त त्यांनी भागीदारी घेतली व नट म्हणून त्यांनी काम केले. वर्ष 1917 मध्ये त्यांनी “शिवराज नाटक मंडळी’ या संगीत नाटक मंडळीची स्थापना केली.आपल्या कंपनीसाठी त्यांनी नवी नाटके लिहिली, पदे रचली तसेच संगीतही दिले. त्यांनी “धैर्यधर’ (मानापमान), “कच’ (विद्याहरण), “चारूदत्त’ (मृच्छकटिक) या भूमिकेसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळविली. “मानापमान’ या नाटकास त्यांनी संगीतही दिले. संगीतकार म्हणून नाटकास त्यांनी रागदारी संगीत, ठुमरी बाज इत्यादी प्रकार पहिल्यांदाच संगीत रंगभूमीवर आणले. त्यांनी वर्ष 1930 मधे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.त्यानंतर प्रभात, इंपीरियल, ईस्ट इंडिया, मिनर्व्हा, नटराज इ. संस्थांच्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या.
“अयोध्येचा राजा’ या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. संवादलेखन, गीतरचना व संगीतदिग्दर्शन या क्षेत्रांतही प्रशंसनीय कामगिरी केली. कृष्णाजी खाडिलकर यांनी लिहिलेली व “चंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी, युवतिमना दारुण रण, शूरा मी वंदिले तसेच नाही मी बोलत’ ही “संगीत मानापमान’मधील नाट्यगीतांना त्यांनी संगीत दिले. “रामरंगी रंगले मन’ तसेच “मधुसूदना हे माधवा’ ही गोड नाट्यगीतेही त्यांनी लिहिली.
त्यांची बोटे सुलभपणे पेटीवर फिरत व सुंदर स्वर गाण्याला साज चढवीत असत. जयपूर घराण्याची तेढी, बिकट गायकी व अभिजात नाट्यसंगीत या दोन्हींसाठी वादन कुशलतेने करीत. किर्लोस्करी नाट्यसंगीताला अभिजात हिंदुस्थानी संगीताचा तसेच वेधक कर्नाटकी चालींचा नवीन साज गोविंदरावांनी चढविला. माझा संगीत-व्यासंग (1939), माझा जीवन विहार (आत्मचरित्र, 1948), खॉंसाहेब अल्लादियाखॉं यांचे चरित्र (1954), जीवनव्यासंग (1956) ही त्यांची महत्त्वाची ग्रंथनिर्मिती आहे. गोविंदरावांचा विवाह लक्ष्मी यांच्याशी झाला. त्यांना रघुनाथ, गणेश व माधव हे तीन पुत्र. माधव हेदेखील संवादिनी वाजवीत असत. गोविंदरावांचे 9 ऑक्टोबर 1955 रोजी दिल्ली येथे निधन झाले.