आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील महत्त्वाच्या शक्ती असणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी मालिकेला आजपासून नागपूर येथे प्रारंभ होणार आहे. गेली अनेक वर्षे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या नावाने या दोन देशांमध्ये कसोटी क्रिकेटचा महासंग्राम खेळवला जातो. पण यावर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येत असल्याने या कसोटी मालिकेला निश्चितच महत्त्व आहे. एकतर चार कसोटीच्या या मालिकेत भारताने निर्भेळ यश मिळवले, तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित होणार आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया आधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळेच या स्पर्धेत भारताने मिळवलेले यश महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दोन वर्षांपूर्वी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकासाठी कसोटी मालिका खेळवण्यात आली होती तेव्हा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करून भारतीय संघाने या चषकावर नाव कोरले होते. तेव्हा अनेक महत्त्वाचे खेळाडू भारतीय संघापासून दूर असतानाही काही नवोदित खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारली होती.
साहजिकच यावेळी भारताला भारताच्याच भूमीत पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक आहे. म्हणूनच ही मालिका अतिशय रंगतदार होणार आहे. कसोटी क्रिकेटमधील प्रथम क्रमांकाचा संघ कोणता, हे या निमित्ताने जगाला कळणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगात सर्वत्र झटपट क्रिकेटचा विशेषत: 20 षटकांच्या क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना तयार होत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनीसुद्धा कसोटी क्रिकेट संपणार असे भाकीत केले आहे; पण जेव्हा जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा बलाढ्य संघांमध्ये कसोटी क्रिकेट खेळवले जाते तेव्हा क्रिकेटचा खरा आनंद रसिकांना उपभोगता येतो, हेसुद्धा नाकारून चालणार नाही. 50 षटकांचे झटपट क्रिकेट अस्तित्वात येण्यापूर्वी आणि लोकप्रिय होण्यापूर्वी कसोटी क्रिकेट कंटाळवाणे ठरत होते.
अनेक सामन्यांचे निकालच लागत नव्हते आणि सामने अनिर्णित घोषित करावे लागत होते. त्यामुळेच ज्या सामन्यांमध्ये निकाल निश्चित आहे अशा 50 षटकांच्या क्रिकेटची लोकप्रियता वाढली. नंतरच्या कालावधीमध्ये या 50 षटकांच्या झटपट क्रिकेटची जागा 20 षटकांच्या सामन्याने घेतली. गेल्या वीस वर्षांतील कसोटी क्रिकेटच्या काळावर नजर टाकली तर कसोटी सामने अनिर्णित होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. हा झटपट क्रिकेटच्या खेळाचा परिणाम असावा; पण कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या दिवसांपूर्वीच सामन्याचे निकाल लागत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या बहुतेक देशांनी कसोटी क्रिकेटसाठी काही ठराविक खेळाडूंना बाजूला ठेवले आहे. जसे भारतीय संघाने चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूला फक्त कसोटी क्रिकेटसाठीच राखीव ठेवले आहे. म्हणजेच जरी झटपट क्रिकेटचा बोलबाला असला तरी कसोटी क्रिकेटचे महत्त्व अजून कमी झालेले नाही.
बॉर्डर-गावस्कर चषकासारख्या मालिकांच्या माध्यमातून या कसोटी क्रिकेटचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज स्टीवन स्मिथ याने भारतात आल्या आल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकापेक्षाही बॉर्डर-गावस्कर चषक महत्त्वाचे असल्याचे विधान केले होते, हे निश्चितच खरे आहे. कारण, गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकांची लोकप्रियताही काही प्रमाणात कमी झाली आहे. ज्या तीव्रतेने आणि संघर्ष भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने खेळवले जातात त्याची उत्सुकता जगभरातील रसिकांना असल्यानेच बॉर्डर-गावस्कर चषकाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
ऑस्ट्रेलियासुद्धा आता इंग्लंडपेक्षाही भारताला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी मानत आहे. कारण, आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्याचे काम फक्त भारतानेच वेळोवेळी केले आहे. 2000 च्या सुरुवातीला जेव्हा स्टीव्ह वॉ च्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौऱ्यावर आला होता तेव्हा या संघाने सलग 15 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. भारतात आल्यावर भारतीय संघाने या संघाची विजयी घोडदौड रोखली होती. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे महत्त्व लक्षणीय पद्धतीने वाढले होते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये काही अपवाद वगळता भारतीय संघाने कधीच ऑस्ट्रेलियाला आपल्यापेक्षा वरचढ होऊ दिले नाही. ऑस्ट्रेलियात गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी मालिकेतील मानहानिकारक पराभव वगळता भारतीय संघाने कधीही कांगारूंसमोर गुडघे टेकले नव्हते.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियातील या मालिकेमध्ये भारताच्या दुबळ्या संघानेच पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतरही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. या पराभवाचा बदलाही ऑस्ट्रेलियाला घ्यायचा आहे म्हणूनच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही बॉर्डर-गावस्कर चषकासाठी असलेली कसोटी मालिका निश्चितच रंगतदार ठरणार आहे. दोनही संघ तुल्यबळ असल्याने आणि दोन्ही संघांमध्ये टोकाची ईर्ष्या असल्याने निश्चितच क्रिकेट रसिकांना अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाला भारतात हरवणे अतिशय कठीण आहे, याची जाणीव जगातील सर्वच क्रिकेट खेळणाऱ्या देशांना असते; पण ती जाणीव ऑस्ट्रेलियाला जरा जास्तच असल्याने त्यांनी या मालिकेसाठी खूपच तयारी केली आहे. भारताचा विचार करताना भारताला ही मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागणार आहे. एक तर भारताच्याच भूमीवर भारताला जर ऑस्ट्रेलियाने पराभूत केले, तर ती निश्चितच नामुष्कीची गोष्ट ठरणार आहे. दुसरे म्हणजे या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तरच भारताचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश होणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांची लढत ऑस्ट्रेलियाशीच होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघातील सर्वच खेळाडू फॉर्मात असल्याने आणि ऑस्ट्रेलियाला हरवण्याची इच्छाशक्ती सर्वांचीच असल्याने निश्चितच सध्या तरी या मालिकेसाठी भारत हा फेव्हरेट विजेता आहे. पण क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या अशा या बॉर्डर-गावस्कर चषकावर पुन्हा एकदा नाव कोरण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला मोठ्या प्रमाणावर परिश्रम करून मैदानावर घाम गाळावा लागणार आहे. भारतासह जगभरातील क्रिकेट रसिकांना एका दर्जेदार क्रिकेटचा आनंद आगामी महिनाभर घेता येणार आहे, हे निश्चित.