कालपरवाच एक व्हिडिओही जारी करत उघड उघड प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न अमृतपालकडून केला जातो आहे. हे सगळे रोखावेच लागेल. मात्र, त्याच वेळी परदेशी भूमीतून पंजाबमधील वातावरण बिघडवण्यात काही हातभार लागत नाही ना, याकडेही लक्ष द्यावे लागेल.
गेल्या दोन महिन्यांपासून अमृतपाल नावाची भानगड भारतात सुरू आहे. तो कुठून आला वगैरे बातम्या दिल्या गेल्या. त्याला कोणाची फूस असावी याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. त्याचे उद्दिष्ट काय आहे तेही एव्हाना माहिती झाले आहे. मात्र, जो हेतू घेऊन तो आला आहे किंवा होता तो देशासाठी चांगला नाही. पंजाब या महत्त्वाच्या राज्यासाठी तर मुळीच चांगला नाही. पंजाबमध्ये काही मूठभर समर्थक संघटना सोडल्या तर त्याची कड कोणी घेतली नाही. पण आताच्या युगात तुमची लढाई तुम्हाला परदेशी भूमीतूनही लढता येते. तशी ती अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांनी सुरू केली आहे. त्यामागे अर्थातच कोणत्यातरी संघटित शक्तीची ताकद असणार आहे. प्रश्न एवढाच आहे की ज्या भूमीवरून भारतविरोधी वातावरण तयार केले जात आहे त्या देशांची या सगळ्याला संमती आहे का? त्यांच्या यंत्रणांतील हा ढिसाळपणा आहे की, त्यांच्यातले कोणीतरी या व्यापक कटाचा भाग आहेत?
खलिस्तानवादी अमृतपाल अचानक भारतात प्रकटला. त्याच्या समर्थकांनी त्यांच्या साथीदारांच्या सुटकेसाठी पोलीस ठाणेच ओलिस ठेवल्याचा प्रकार केला. हवेत तलवारी नाचवल्या, त्यांच्याकडे बंदुकाही होत्या. जेव्हा व्यवस्थेविरुद्ध अशी झूंडशक्ती यशस्वी होते तेव्हा हल्ली सर्वसामान्यांतील मर्यादित लोकच हादरतात. मोठ्या वर्गाला झुंडशाहीचे नेतृत्व करणाऱ्यांचे आकर्षण वाटू लागते. त्यातून झुंडीचे ग्लॅमर वाढते. जेव्हा हा प्रकार होतो किंवा होऊ लागतो तेव्हा तो अनियंत्रित होऊन हाताबाहेर कधी जातो ते कळत नाही. ज्या पंजाबला बऱ्याच हिंसेनंतर आणि होरपळीनंतर शांततेची पहाट अनुभवायला मिळाली आहे त्या पंजाबवर हे संकट पुन्हा घोंघावते आहे.
अमृतपालचे लक्ष्य काय, त्याचे बोलविते धनी कोण, त्यांची तशी करण्यामागची योजना काय हे समोर येईलच. मात्र, अमृतपालबद्दल कथित सहानुभूती दाखवणारे आणि त्याच्या मागणीच्या समर्थनार्थ दिशाभूल झालेले काही लोक परदेशातही भारताच्या विरोधात उत्पात माजवत आहेत. लंडनमध्ये त्यांनी भारताच्या दूतावासाला लक्ष्य केले. सॅन फ्रॅन्सिस्कोतील भारतीय वाणिज्य दूतावासही त्यांचे लक्ष्य ठरला. ब्रिटन आणि अमेरिकेत घडलेल्या या घटनांची केवळ निंदा करणे पुरेसे नाही. कठोर कारवाई केली जाणे अपेक्षित आहे. तथापि, या दोन्ही ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्थाच नव्हती. त्याहून वाईट बाब म्हणजे भारतीय ठिकाणांना लक्ष्य करणाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाईही अद्याप झालेली नाही.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घटस्फोटित पत्नी त्यांच्या मुलांसह अमेरिकेत राहते. मान यांची दोन मुले तेथे आहेत. त्यांना लक्ष्य करण्याचे निर्देश अमेरिकेतील संस्थेच्या अधिकृत व्यासपीठावरून दिले गेले. मान यांच्या मुलीला धमकावले जात आहे. त्यांच्या वकिलाने स्वत: समोर येत समाजमाध्यमांवर ही माहिती दिली. ब्रिटन आणि अमेरिकेत लोकशाहीच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा सकाळ संध्याकाळ झोडल्या जातात. मात्र, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य त्यांच्या मतलबापुरतेच संकुचित असावे. आपले ते स्वातंत्र्य आणि दुसऱ्याचा द्वेष म्हणजे लोकशाही अशी त्यांची बहुधा मांडणी असावी. त्याचे कारण या देशातील भारतीय वंशाच्या नागरिकांवर वरचेवर हल्ल्याच्या घटना घडत असतात.
भारतात अपवादाने विदेशी पर्यटकांच्याबाबत चुकीच्या गोष्टी घडतात. त्यावेळी भारतीय समाजच विकृत असल्याचे चित्र रंगवण्याचा खटाटोप केला जातो. मानवाधिकार संघटना, संयुक्त राष्ट्रेही सल्ले देतात. चुकीचे झाले असेल तर त्याचा स्वीकारच, मात्र जर काही भारतविरोधी लोकही परदेशात संघटितपणे भारताच्या विरोधात फुत्कार सोडतात, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तसे झाल्याचे किंवा जरब बसेल अशी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय युवकांवर हल्ले होण्याच्या बातम्या नियमितपणे येत असतात. केवळ ब्रिटन आणि अमेरिकाच नाही, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातही हे सगळे होते आहे. भारतीयांच्या मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. कुठे भारतीयांच्या विरोधातील मजकूर लिहिला जातो. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची विटंबना केल्या जाण्याच्या घटनाही घडल्या. अमेरिकेतच काही महिन्यांपूर्वी एका संपूर्ण शीख कुटुंबाला निर्घृणपणे संपवले गेले. या सगळ्या घटनांबद्दल तेथील सरकारांकडून खेद व्यक्त केला जातो. दुर्दैवाने त्यापुढे फार काही होत नाही. त्यामुळे घटना ठराविक काळानंतर पुन्हा घडत राहतात.
भारतविरोधी खलिस्तानवादी विचारसरणीच्या प्रवृत्तींच्या विरोधात निष्क्रियता धोकादायक आहे. ही बेफिकिरी आहे की, कोणत्या समजून केलेल्या कटाचा भाग आहे? त्या राष्ट्रांना हे प्रश्न विचारावेच लागतील, मात्र, त्याचवेळी काही ठराविक ठिकाणीच अशा घटना का घडत आहेत, त्याच्या मुळाशीही भारताला जावे लागेल. ज्या चार देशांत प्रामुख्याने घटना घडत आहेत त्या सर्व राष्ट्रांशी भारताचे चांगले संबंध आहेत. मैत्रीची जी नवी व्याख्या केली जाते त्या व्याख्येत ती राष्ट्रे बसतात. मध्यंतरी ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रप्रमुख भारतात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. कॅनडातील हल्ल्यांचाही विषय मांडला गेला आहे. पुढे काही झाल्याचे अद्याप समोर आले नाही. जर भारतविरोधी प्रवृत्तींना नियंत्रित करण्याबाबत ही राष्ट्रे तत्परता दाखवत नसतील, तर भारतासोबतच्या संबंधांवर त्याचे विपरीत परिणाम होतील हे सांगण्यात भारताने किंचितही संकोच बाळगता कामा नये. त्यांच्या सुस्तीमुळे, दुर्लक्षामुळे भारताला जे नुकसान भोगावे लागू शकते ते भारताला परवडणारे नाही. पंजाबला पुन्हा अंधाराच्या
गर्तेत लोटल्यासारखेच ते होईल.
खलिस्तान समर्थकांकडून आतापर्यंत जी काही कृत्ये केली गेली आहेत त्याची कार्यपद्धती भारतालाच नव्हे तर जगालाही अपरिचित नाही. ज्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत तेथे भारतीयांसोबतच एका विशिष्ट देशांच्या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्याचाही एक कोन येथे विचारात घ्यावा लागेल. हा भारताला त्यांच्याच लोकांकडून जखमी करून रक्तबंबाळ करण्याच्या कटाचा भागही असू शकतो. त्यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांची कितपत साथ मिळेल किंवा मिळणारही नाही, आपल्या सुरक्षेसाठी आपल्यालाच चौकस राहावे लागेल. दिशाभूल केलेली डोकी सगळ्यांसाठीच धोकादायक असतात. आता भारतातच सरकारला अल्टीमेटम देण्याचे प्रकार पंजाबमधील काही संघटनांनी केले आहेत. याकडेही लक्ष द्यावे लागेल.