महाराष्ट्राची राजधानी नागपूरला असू द्या
नागपूर – महाराष्ट्राची राजधानी नागपूर येथेच राहावी अशी मागणी करणारा ठराव म्यु. कॉर्पोरेशनमध्ये संयुक्त नागरी आघाडीचे नेते देशराज यांनी मांडला असून त्याची आज चर्चा सुरू झाली पण कोरम मध्येच मोडल्याने ती अपुरी राहिली. ठरावाचे प्रवक्ते म्हणाले, मुंबई महाराष्ट्रात येईपर्यंत निदान पाच वर्षे नागपूरलाच राजधानी ठेवावी.
नव्या मध्य प्रदेशाची राजधानी – भोपाळ
इंदुर – नियोजित मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथे ठेवण्यासंबंधी अखेरी निर्णय कॉंग्रेस कार्यकारिणीने घेतला आहे, असे मध्यभारत कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. खाडीवाला यांनी निवेदन केले. यासंबंधी अधिकृत घोषणा लवकरच होईल. नव्या राजधानीतील कचेऱ्या संबंधीची व्यवस्था करण्याबाबत हायकमांडने एक समिती नेमली आहे. समितीची भोपाळ येथे लवकरच बैठक होईल.
नेहरू काकांना दीर्घायू द्या! मुलांचे ब्रह्मदेवाला पत्र
गोरखपूर – गोरखपूर जिल्ह्यातील भथाट समूह विकास योजनेच्या क्षेत्रातील बराहदी खेड्याच्या बालकांनी ब्रह्मदेवास एक पत्र पाठवून नेहरू काकांना दीर्घायू देण्याची प्रार्थना केली आहे. या बालकांनी सभा घेऊन नेहरू काकांचा वाढदिवस साजरा केला. ब्रह्मदेवास पाठविलेल्या पत्रात त्या मुलांनी म्हटले आहे की, आमच्या आवडत्या काकांना दीर्घायू केलेत तर ते पृथ्वीचा स्वर्ग बनवतील. हा स्वर्ग तुमच्या स्वर्गाहूनही चांगला असेल!
अतिथींवर फुलांचा मारा करू नका
नवी दिल्ली :- भारत-भेटीस येणाऱ्या परदेशी अतिथींवर फुलांचा व पुष्पगुच्छांचा मारा करू नये. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो, पाहुण्यांना लागण्याचाही संभव असतो, असा पंतप्रधान पं. नेहरू यांनी भारतीय जनतेस आदेश दिला आहे.
अतिथींचे उचित स्वागत आपण करीत आलो असून त्यांना आपल्या उत्साही स्वागताचा त्रास होऊ नये, बेशिस्तीचे प्रदर्शन होऊ नये, अशी अपेक्षा पं. नेहरू यांनी व्यक्त केली आहे.