पाककडून शस्त्रास्त्रांची जमवाजमव
नवी दिल्ली, दि. 12 – पाकिस्तानच्या व बांगलादेशाच्या सरहद्दीवर भारत सेनेची जमवाजमव करीत आहे, असा पाकिस्तान नभोवाणीने व पाकिस्तानी वृत्तपत्रांनी चालविलेला प्रचार संपूर्णपणे खोटा व निराधार आहे, असे भारताने पाकिस्तानला कळविले आहे.
याउलट पाकिस्तानच शस्त्रास्त्रांची जमवाजमव करीत असल्याचे दिसून आले. परराष्ट्र व्यवहार खात्याचा एक प्रवक्ता म्हणाला, उपखंडात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या भारताच्या धोरणात काहीही बदल झालेला नाही. पाकिस्तानने स्वतःच्या देशातील राजकीय परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.
देवदासीविषयक कायद्याची नीट अंमलबजावणी नाही
नागपूर – 1934च्या “मुंबई देवदासी संरक्षण कायद्या’ची योग्य रितीने अंलबजावणी झाली नसल्याचे आज विधान परिषदेत समाजकल्याण मंत्री प्रतिभा पाटील यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, या कायद्याची अंमलबजावणी कडकपणे व्हावी, अशा सूचना सरकारने पोलीस खात्याला दिल्या आहेत.
देवदासी प्रथा अजून चालू असल्याचे वृत्त कळल्यावर मी याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या अधिवेशनात एक विधेयक मांडण्याचे ठरले होते. परंतु असा पूर्वीच एक कायदा झालेला आहे, तो आणखी कडक करण्यात येईल.