-धनंजय एकबोटे
दरबार भरला आहे. महाराज अस्वस्थपणे येरझरा घालत आहेत. अष्टप्रधान मंडळ महाराज काळजीत असल्याने चिंतेत आहेत. प्रधानजी दरबारात प्रवेश करतात तसे सर्वांचा संयमाचा बांध फुटतो व प्रधानजींच्या नावाचा जयजयकार करायला लागतात. महाराज क्रोधाने लालबुंद होतात.
– प्रधानजी, काय हे? वरचेवर दरबारात आमच्याऐवजी तुमच्या नावाचा जयजयकार अधिक होतो आहे. लोकप्रियता तुमची वाढत आहे?
– महाराज, क्षमा असावी. वर्क फ्रॉम होमचा हा तोटा आहे. आम्ही कसे पंचक्रोशीत फिरत राहतो ना.
– कुठे गेले होतात आता? तेही न सांगता? काही रितभात?
– महाराज, गोपनीय भेट होती. तुम्हाला कळवले असते तर डोनाल्ड ट्रम्पनादेखील कळले असते आतापर्यंत..!
– आता सांगा.
– महाराज, जनतेच्या मनातील भीती घालवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे.
– कळले नाही, सविस्तर सांगा.
– महाराज, जनतेच्या मनातील करोनाविषयी भीती आहे. चोवीस तास तेच डोक्यात, चॅनलवरसुद्धा तेच दळण दळणे सुरू होते. मग मी विचार केला, जनतेच्या मेंदूला खाद्य द्यायचे आणि मी सक्रिय झालो.
– कसे प्रधानजी?
– महाराज, दुसऱ्याच्या घरात डोकवायला लोकांना आवडते. हो ना? मग मी रोज नवा विषय शोधून काढायचे ठरवले.
– प्रधानजी, पण ते गुप्तभेटीचे काय?
– धीर धरा महाराज, सांगतो. मी अशा व्यक्तीला भेटून आलो, जीची चर्चा बऱ्याच दिवस होईल.
– नाव सांगा ना प्रधानजी.
– मी पुन्हा येणार.
– कुठे चाललात? नाव तर सांगून जा. मी पुन्हा येणार काय?
– महाराज, मी इथेच आहे हो आपल्या सेवेत. मी कुणाला भेटायला गेलो हे सांगितले.
– काय? ही गुस्ताखी! टकमक टोकावरून!
– काहीतरीच! काळ बदलला आहे, महाराज. आता टोक गाठू नका.
– मग का गेलात तिकडे?
– करोनाची भीती घालवायला महाराज
– कसे काय बुवा?
– कंगना, बॉलीवूड, ड्रग्ज हे सर्व विषय आल्यामुळे काय झाले सांगा बरं?
– काय झाले?
– महाराज, जनतेची टेस्ट बदलली. आता करोनाची बातमी लावली तर लोक चॅनल बदलतात आणि या बातम्या चवीने बघतात.
– काय सांगता?
– तर महाराज. लोक बेरोजगारी, करोना हे विसरायला लागलेत.
– प्रधानजी, पण तुम्ही भेटीदरम्यान काय बोलले?
– महाराज, ते काही दिवसांनी सांगेल. आज नको. पुढे विषय हवा ना.
– गुपचूप कानात सांगा, दरबारात नको, चालेल?
-ओके. चला महाराज.
महाराज तखलिया म्हणून दरबार संपल्याची घोषणा करतात व प्रधानजींकडे कौतुकाने पाहात गळ्यातला कंठा काढून प्रधानजींच्या गळ्यात घालतात व हातात हात घालून गोपनीय स्थळी रवाना होतात.