अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले गुरू शहाण्णव वर्षांचे लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देऊन ‘गुरूदक्षिणा’ दिली. संघ परिवारातील तिसरे आणि भारतरत्नच्या यादीतील पन्नासावे.
लालकृष्ण आडवाणी हे कराचीत जन्माला आलेले सिंधी! फाळणीनंतर भारतात आलेले. त्यांच्या या पार्श्वभूमीला महत्त्व देऊन तत्कालीन संघ नेतृत्वाने त्यांना जनसंघाचे अध्यक्षपद दिलं आणि त्यांच्याच हस्ते अटलबिहारी वाजपेयी यांचे कट्टर विरोधक बलराज मधोक यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर भाजपमध्ये आणि देशात अटल-आडवाणी यांचा दबदबा चांगलाच वाढला.
आज भाजप 303 सदस्य घेऊन लोकसभेत सत्ताधारी आहे याचं मूळ तयार करून दिलं आहे आडवाणींच्या रथयात्रेने! सोमनाथ ते अयोध्या! रथयात्रा काढल्याने भाजपचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला. रथयात्रा ज्या पद्धतीने काढली गेली त्याचं संपूर्ण श्रेय भाजपचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन यांचं! याची कबुली आडवाणींनी आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. 1989 ते 2005! सोळा वर्षे आडवाणी संघ परिवाराच्या गळ्यातले ताईत होते. या सोळा पैकी सहा वर्षे भाजप सत्तेवर होता. संघाच्या मनातले ते खरे पंतप्रधानपदाचे उमेदवार! 2002 मध्ये वाजपेयींना राष्ट्रपती, डॉ. फारुक अब्दुल्ला यांना उपराष्ट्रपती आणि आडवाणी पंतप्रधान असा फॉर्म्युला ठरला होता.
काश्मिरी मुस्लीम नेत्याला भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपराष्ट्रपती बनवून काश्मीरप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा प्लॅन! पण हा फॉर्म्युला अंमलात येऊ शकला नाही. याबाबत नेते फारसं बोलत नाहीत. पण याला दोन कारणं मानली जातात. एक स्वतः वाजपेयींनी पंतप्रधानपद सोडून राष्ट्रपती बनण्यात स्वारस्य दाखवलं नाही. तर दुसरीकडे आडवाणींनी आपल्याला पंतप्रधान पद पाहिजेच असा आग्रह धरला नाही. एक प्रकारे आडवाणी वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाच्या बाहेर येऊ शकले नाहीत. वाजपेयींच्या वक्तृत्वाची भीती आणि असूया आडवाणींच्या मनात असावी. वाजपेयींची ओघवती वक्तृत्व शैली पाहून आपल्या मनात न्यूनगंड निर्माण व्हायचा, याची कबुली आडवाणींनी आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. आणि म्हणून ते भाजपमधल्या नंबर दोनच्या पोझिशनच्या पुढे जाऊ शकले नाही. आडवाणींना उपपंतप्रधान पदावरच समाधान मानावं लागलं.
जसे आडवाणी पंतप्रधान पदापासून वंचित राहिले तसेच प्रमोद महाजन वंचित राहिले गृहमंत्री पदापासून! कारण आडवाणी पंतप्रधान झाले असते तर महाजन गृहमंत्री बनले असते. त्याच काळात गोध्रा घटना घडली होती. मोदींचं नाव गाजत होतं. परिवारातील एका नेत्याने मला म्हटलं अटल-आडवाणी या जोडीनंतर महाजन-मोदी ही आमची नेतृत्वाची जोडी असेल. पण महाजनांच्या सख्ख्या भावाने त्यांचा खून केला आणि नेतृत्व मोदींच्या हातात आलं! असो!
आडवाणींच्या राजकीय जीवनातला सर्वात कठीण काळ म्हणजे जिनांच्या कबरीला त्यांनी दिलेली भेट. 2004 साली झालेल्या पराभवामुळे भारतातील मुस्लीम मतदारांना चुचकारण्यासाठीच जिनांना निधर्मी, दशावतार म्हणणारे असूनही त्यांनी त्यांच्या कबरीवर चादर चढवली. पण त्यांचं हे कृत्य संघ परिवाराला मानवणार नव्हतं.
तत्कालीन सरसंघचालक के एस सुदर्शन यांनी पक्षाचे जनरल सेक्रेटरी संजय जोशी यांना आडवाणींचा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यास पाठवलं. आडवाणी या वादळातून बचावले ते वाजपेयी आणि महाजन यांच्या पाठिंब्यामुळेच! पण संजय जोशी मात्र पक्षातून बाहेर फेकले गेले. या घटनेनंतर आडवाणी कधीही सावरू शकले नाहीत. 2009 मध्ये भाजप त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. मात्र, मोदींचं मुख्यमंत्रिपद आडवाणींनी 2002 साली गोध्रा दंगलीनंतर वाचवलं होतं. पुढे मोदी यांनी पंतप्रधान पद मिळवलं. इतकंच नव्हे तर 2017 साली भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची आडवाणींना राष्ट्रपती करण्याची इच्छा असताना रामनाथ कोविंद या दलित नेत्याला राष्ट्रपती केलं गेलं. वय झालेल्या आडवाणींच्या हातात मोदींचा करिश्मा पाहण्यापलीकडे काहीच नव्हतं. नितीन गडकरी यांच्यासारखे त्यांचे समर्थक घडणार्या घटना पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते.
अटलबिहारी वाजपेयींना 2015 साली आणि नानाजी देशमुखांना 2019 साली भारतरत्न देण्यात आलं. याच नानाजींनी 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशाने राजीव गांधींच्या पाठीशी उभ राहावं, असं आवाहन केलं होतं. संघ परिवारातील विरोधाभास! आता भारतरत्नच्या या यादीत आडवाणींचा नंबर लागला आहे.
देशावर 16 वर्षे भाजपच्या पंतप्रधानांनी राज्य केलं आहे. दरवर्षी माध्यमात सावरकर, हेडगेवार, गोळवलकर यांना भारतरत्न दिले जाईल अशी चर्चा व्हायची. संघ परिवार भारतरत्न केवळ नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तींनाच का मिळतो, हा मुद्दा नेहमी मांडतात. नेहरू-इंदिरा गांधी यांना ते स्वतः पंतप्रधान असताना भारतरत्न मिळालं तर राजीव गांधींना त्यांच्या मृत्यूनंतर 26व्या दिवशी. एकाच परिवारातील तीन भारतरत्न! तिघेही पंतप्रधान! मात्र भाजपाने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न दिला तर मुलायमसिंग यादव यांना गेल्या वर्षी पद्मविभूषण, हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने!
भारतरत्न हा सर्वोच्च नागरी बहुमान त्यांना दिला जातो ज्यांच्या कामगिरीमुळे समाजाची प्रगती झाली आहे. या यादीत आता लालकृष्ण आडवाणी यांचेही नाव आले आहे.