अतिथी देवो भव या भारतीय परंपरेचे आपण जगभरात गुणगान करतो. वसुधैव कुटुंबकम अर्थ हे संपूर्ण विश्व माझे कुटुंब असल्याचे म्हणतो. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्मपरिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाचे दाखले देतो. संपूर्ण मानवजातीला अहिंसेचा मार्ग दाखवणार्या महात्मा गांधींचा हा भारत असल्याचे म्हणतो आणि मानतो. तथापि, हे पुरेसे आहे का? किंवा केवळ जाहीरातबाजीसाठी अथवा मोहीम- अभियान राबवण्यासाठीच ही वाक्ये आहेत असे आपण मानून घेतले आहे का? तसे जर असेल जगात भारताची वेगळी ओळख निर्माण करायला आणि तशी जर ती कदाचित अगोदरच झाली असेल तर ती टिकवायला आपल्याला अद्याप बराच पल्ला गाठावा लागणार आहे. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात झारखंडमध्ये घडलेली बलात्काराची धक्कादायक घटना.
पर्यटक म्हणून भारतात आलेल्या महिलेवर अत्याचार झाले. तिच्या नजरेत अगोदर जो भारत होता तो आता असेल का हा प्रश्नच आहे. त्याची उत्तरे सगळ्यांनाच शोधावी लागणार आहे. स्पेन येथून पतीसोबत बाइकवर जगभ्रमंती करण्यासाठी निघालेली एक महिला. बांगलादेशमार्गे ती भारतात आली. साधारण महिनाभर ती भारतात होती. 20 हजार किमीचा प्रवास तिने केला. पुढे ती बिहारमार्गे नेपाळला जाणार होती. त्या दिवशी झारखंड या राज्यातील डुमका येथे हे दाम्पत्य पोहोचले. रात्रीचे 12 वाजले होते. त्यांना ती शांत आणि सुंदर जागा आवडली. तेथेच टेंट टाकून मुक्काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आतापर्यंतच्या देशोदेशींच्या प्रवासात त्यांनी असेच केले होते. निर्जन ठिकाणी आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना नव्हती. सात-आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आपण आता मरणारच अशी भिती त्यांच्या मनाला स्पर्शून गेली. हल्लेखोरांनी त्या महिलेवर अत्याचार केला. नंतर तिला उशीरा मदत मिळाल्यावर दवाखान्यात दाखल करण्यात आले. सूस्त पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. तीन आरोपींना त्यांनी अटक केल्याचे वृत्त होते आणि अन्य जणांचा शोध सुरू होता.
गुन्हेगारांना पोलीस आणि प्रशासनाचे भय नसल्याचे या घटनेतून सिध्द होते आहे. अशा घटना घडल्या की जनक्षोभ उसळतो. माध्यमांमध्ये त्यावर कोरडे ओढले जातात. मात्र प्रश्न असा आहे की असे प्रकार घडल्यावरच प्रशासन जागे का होते? एरव्हीही जर त्यांनी अशी सतर्कता बाळगली किंवा कायम ठेवली तर गुन्हेगारांच्या मनात कायद्याचे भय निश्चितच निर्माण होईल. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे अगोदरच रोखले जातील. दुर्दैवाने तसे करण्यात आपण कमी पडतो आहोत. दर एक- दोन वर्षांनी पर्यटक महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. काही मोजकी राज्ये आहेत जेथे पर्यटक भारतात आल्यावर आवर्जुन भेटी देतात. किमान त्या राज्यांनी तरी हा विषय अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवा.
भारत आज वेगाने आर्थिक विकास करतो आहे. जगातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये आपला समावेश आहे. मोजकेच देश ज्या बाबी साध्य करू शकले त्यात भारताचाही समावेश आहे. विदेशात जाणार्या भारतीयांनी देशाची किर्ती तेथे पसरवली आहे आणि त्यांचे स्वत:चे श्रेष्ठत्वही सिध्द केले आहे. हा बदललेला भारत आहे, तुम्ही एकदा पाहायला या असे आपण म्हणतो. पाहुणा हा आपल्यासाठी देवासमान असल्याचे दावे करतो. जेंव्हा अशा घटना घडतात तेंव्हा भारत पर्यटकांसाठी व विशेषत: परदेशी पर्यटकांसाठी आणि त्यातही महिला पर्यटकांसाठी सुरक्षित आहे असे आपण म्हणू शकतो? तसले दावे करण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्पेनच्या महिलेच्या बाबतीत जे घडले त्यावरून सिध्द झाले आहे.
परदेशात भारताची अशी घाणेरडी प्रतिमा तयार होणार नाही याकरता आपण काय करतो आहोत हा प्रश्न सर्व राज्यांतील सरकारे, पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांना स्वत:ला विचारावा लागणार आहे. परदेशातून येणारे आपल्या देशाच्या प्रतिमेससाठी, आपल्या संस्कृतीचे चांगुलपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किती महत्वाचे आहेत हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना समजू शकेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. पण पर्यटक असो अथवा भारतातील असो कोणत्याही महिलेच्या विरोधात केल्या जाणार्या गुन्ह्यांबाबत शून्य सहिष्णुताच दाखवावी लागेल.
संबंधित महिला कालच नेपाळला रवाना झाली. भारताबद्दल तिची काही तक्रार नाही. आपल्या येथील वास्तव्यात येथील लोकांनी मदत आणि सहकार्यच केल्याचे तिने सांगितले. आपण भूतकाळातील घटनेत फार काळ राहु शकत नाही. तथापि, सगळ्याच महिलांनी स्वत:ला सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक असल्याची गरज तिने बोलून दाखवली. झाल्या घटनेमुळे कधीही न भरणारी जखम झाली असली तरी जगप्रवासाचा आपला निर्धार पूर्ण करण्याचे तिने म्हटले आहे.
अतिथी देवो भव म्हणणार्या भारतासारखा अनुभव तिला जगात अन्यत्र कुठेही येऊ नये. भारतातील पर्यटकही भारतात सुरक्षित राहावेत. तसे झाले तरच आपण जे दावे करतो आणि स्वप्ने पाहतो त्याकरता लायक असू. अन्यथा आपला आजवरचा इतिहास पाहता उक्ती आणि वस्तुस्थिती यात विसंगतीच कायम आढळून आली आहे. ही विसंगती देश म्हणून भारतीयांनी कदाचित स्विकारली असेल. जग अशा बाबी मान्य करत नाही व त्यामुळेच जाहीरातींच्या पलिकडचा वास्तवातला भारत जेंव्हा त्यांना दिसतो तेंव्हा भारत त्यांच्या प्राधान्याच्या यादीत नसतो.