मुंबई – एकाच वर्षात दोनदा आयपीएल स्पर्धा खेळवल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. सद्यस्थितीत ज्या फॉरमॅटमध्ये आयपीएल खेळवले जात आहे. त्याचप्रमाणे आणखी संघ आणि सामन्यांची संख्या वाढवून ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
वॉनी आणि टफर्स क्रिकेट क्लब पॉडकास्ट कार्यक्रमात ते बोलत होते. रवी शास्त्री म्हणाले, मला वाटते की, आपल्याकडे दोन आयपीएलचे हंगाम असायला हवे. असे झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने कमी करून वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये आयपीएलचा एक छोटा हंगाम आयोजित केला जाऊ शकतो.
आयपीएलमध्ये भविष्यात संघांची संख्या वाढू शकते. तसेच आयपीएलचा एक हंगाम दीड ते दोन महिन्यांचा होऊ शकतो. ही स्पर्धा भारतीय क्रिकेटसाठी अतिशय चांगली आहे. खेळाडूंसह प्रसारक आणि विविध संघांसोबत करणाऱ्यांसाठी हे एक चांगले उत्पन्नाचे साधन आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामन्यांची संख्या वाढल्याचे कारण देत बेन स्टोक्सने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आयसीसीचे वेळापत्रक चर्चेत आले होते. यासंदर्भात बोलताना, द्विपक्षीय टी-20 मालिका खेळवणे बंद करायला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.