नागपूर – विदर्भातील पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. गोसीखुद धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने धरणातून 30257 पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. गडचिरोलीत झालेल्या नुकसानीची पाहणी करुन लवकरात लवकर मदत जाहीर करु, अशी माहिती नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्याला तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. गोसीखुद धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने धरणातून 30257 पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगज, अहेरी सिरोंचा या चार तालुक्यांना अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विदर्भाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील जवळपास 10 मार्ग बंद झाले आहेत. या भागात हजारो हेक्टर शेतीला पुराचा फटका बसला आहे. रात्रीपासून आतापर्यंत 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
या पुरस्थितीचा आढावा एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, गडचिरोलीत महापुरामुळे शेती आणि घराचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पाहणी झाल्यानंतर लवकरात लवकर मदत जाहीर करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
ब्रम्हपूरीला सर्वाधिक फटका
चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्याला पूराचा सर्वाधिक फटका बसला असून बचाव कार्यात सोमवारी पूरात अडकून पडलेल्या 3 हजार 160 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सोमवारी सकाळी हेलिकॅप्टरने लाडज गावातील बहुसंख्य लोकांना बाहेर काढले गेले. ब्रम्हपुरीत रविवारी पुराने कहर केल्याने अर्धा तालुका पाण्याने कवेत घेतला आहे. याचा फटका सामान्य जीवनावर पडल्याने तालुका व शहर वासीयांचा जनजीवन विस्कळीत झाले आहे.