देशातील आघाडीची माध्यम संस्था असलेल्या इंडिया टुडे सी व्होटर या संस्थेने नुकत्याच घेतलेल्या एका जनमत चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले. त्यानंतर संबंधित सर्वच राजकीय पक्षांनी दावे आणि प्रतिदावे करायला सुरुवात केली आहे.
देशात गेल्या काही वर्षांपासून ज्या विविध जनमत चाचण्या घेतल्या जात आहेत त्या चाचण्यांचे निष्कर्ष जर आपल्याला सोयीस्कर आणि अनुकूल असे असतील, तर ते स्वीकारले जातात. त्यावर टीका केली जात नाही. पण जर ते निष्कर्ष आपल्याला प्रतिकूल आणि नकारात्मक असतील, तर त्या निष्कर्षांना काहीही अर्थ नाही, वस्तुस्थिती वेगळी असू शकते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. या नव्या जनमत चाचणीनंतरसुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती दिसत आहे. या चाचणीतील निष्कर्षाप्रमाणे, जर आज लोकसभेची निवडणूक झाली तर पुन्हा एकदा केंद्रामध्ये भाजपची सत्ता येणार. यावर कोणतीही शंका व्यक्त करण्यात आलेली नाही. पण या चाचणीमधील महाराष्ट्राबाबतचे जे निष्कर्ष आहेत, त्यावरून मात्र निश्चितच वादविवाद सुरू झाले आहेत. देशातील इतर राज्यांमधील भाजपची कामगिरी साधारणपणे 2019 च्या निवडणुकीप्रमाणेच जरी राहणार असली, तरी महाराष्ट्रातील भाजपची कामगिरी आणि खासदारांची संख्या घसरेल, असे या चाचणीतून समोर आले आहे.
सध्या महाराष्ट्रातून लोकसभेवर जे 48 खासदार जातात त्यापैकी भाजप आणि पूर्वीची शिवसेना यांचे मिळून 41 खासदार आहेत, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे 7 खासदार आहेत. गेली लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रपणे युती म्हणून लढवली असल्याने त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने 18 आणि भाजपाने 23 जागा जिंकल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी युती होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचा पर्याय उभा असल्याने या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील, असा निष्कर्ष या जनमत चाचणीतून समोर आला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला 34 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला. त्याला उत्तर देताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि शिंदे गटाची एकत्रित कामगिरी गेल्या वेळेपेक्षा जास्त चांगली असेल, असा प्रति दावा केला आहे.
अर्थात वर म्हटल्याप्रमाणे कोणत्याही जनमत चाचणीनंतर अशा प्रकारचे दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी राजकीय वस्तुस्थिती काय आहे हेसुद्धा पाहावे लागणार आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे जे 18 खासदार निवडून आले होते त्यापैकी 12 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांची युती होणार आणि ते एकत्रपणे लोकसभा निवडणूक लढवणार, यातही कोणती शंका नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे जरी एकत्रित निवडणूक लढवणार असले, तरी गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगली कामगिरी करता आलेली नाही. ही वस्तुस्थितीही डोळेझाक करून चालणार नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्याशी युती केली असल्याने ते समीकरणही लक्षात घ्यावे लागणार आहे. गेल्यावेळी शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या; पण महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवताना ठाकरे यांच्या शिवसेनेला एवढ्या जागा वाट्याला येतील का, याचाही विचार करण्याची गरज आहे. कारण जागा वाटपापासूनच वादविवादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांची युती असल्याने भाजपाने ज्याप्रमाणे गेल्या वेळी 25 जागा लढवल्या होत्या त्याचप्रमाणे भाजप त्या जागांवर उमेदवार उभे करेल आणि उरलेल्या 23 जागा एकनाथ शिंदे गटाला सोडू शकेल. त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्न सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे गटासमोर नाही, तर तो महाविकास आघाडी समोर आहे. महत्त्वाचे म्हणजे जसे 2019 मध्ये एकीकडे भाजप-शिवसेना यांची युती आणि दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी यांच्यामध्येच निवडणूक झाली होती, तशाच प्रकारची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे.
कोणती एखादी तिसरी आघाडी समोर येऊन मत विभाजन होण्याची शक्यता खूपच कमी असल्याने कोणत्या एका गटाला फायदा होण्याची पण शक्यता धूसर आहे. मात्र, गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये राज्यात ज्या राजकीय घटना घडत आहेत आणि गद्दार राजकारण किंवा खोक्याचे राजकारण या शब्दांच्या निमित्ताने जी वातावरण निर्मिती केली जात आहे त्याचा परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बहुतांश आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला असला, तरी शिवसेनेचे मूळ पक्षसंघटन कोणाच्या ताब्यात आहे आणि शिवसैनिकांच्या मनात काय आहे यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे. याच वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोनही गटांचे दावे आणि प्रतिदावे यांचा विचार करावा लागणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होते आणि लोकसभा निवडणुकीतील निकालाचा परिणामच विधानसभा निवडणुकीवरही दिसून येतो, असेच आजवरचा इतिहास सांगतो. त्यामुळे इंडिया टुडेच्या जनमत चाचणीच्या निष्कर्षांचा आधार घेतला तर विधानसभा निवडणुकीमध्येसुद्धा महाविकास आघाडी दीडशेपेक्षा जास्त जागा जिंकू शकते, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांना सत्तेपासून बाजूला करणे हीच महत्त्वाची गोष्ट असल्याने त्यांना लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त रस आहे, हे उघड आहे. अर्थात, काहीही असले तरी या जनमत चाचणीच्या निमित्ताने आज जर निवडणूक झाली तर काय होऊ शकेल, याचा अंदाज सर्वच राजकीय पक्षांना आला असेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आणखी सुमारे वर्षापेक्षा जास्त कालावधी असला तरी या जनमत चाचणीच्या निष्कर्षाच्या निमित्ताने सर्वांनाच आढावा घेऊन निवडणुकीची तयारी करण्यास वेळ मिळणार आहे, हे निश्चित.