एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचा एक सुख संवाद चालला होता. बऱ्याच दिवसांनी आपल्या गुरूस भेटलेले गोरक्षनाथ हे सद्गुरूंना वेगवेगळे प्रश्न विचारीत होते. सद्गुरूही त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन शिष्याच्या मनातील शंकांचे निरसन करून त्याची ज्ञान जिज्ञासा पूर्ण करीत होते. अचानक गोरक्षनाथांनी त्यांना विचारले, “”गुरूदेव! बिन पंखाचा उडणारा पक्षी कोणता? गोरक्षाचा तो प्रश्न ऐकला आणि मच्छिंद्रनाथांना त्याचे मोठे कौतुक वाटले.
काहीसे हसत ते म्हणाले, “”वा! गोरक्षा! अरे फार छान प्रश्न विचारलास तू. कारण तुला हे पुरते माहिती आहे की पक्षी हे केवळ त्यांच्या अंगी असलेल्या पंखांच्या बळावरच उडू शकतात, आकाशात विहार करू शकतात. भरारी मारू शकतात. उंच गेल्यावर घारीसारखे पक्षी आपले पंख समांतर आणि स्थिर ठेवून हवेतही स्थिर राहू शकतात. त्याच पंखाच्या बळावर उंच झेपावणे किंवा हवेतून भक्ष्य पाहिल्यावर त्याच्यावर वेगाने सूर मारून कब्जा करणे, हे केवळ निसर्गदत्त पंख आणि त्यातील उडण्याची शक्ती याच्या बळावरच पक्षी करू शकतात. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे हवं तिथ जाऊ शकतात. खरं ना?
आता तुझा प्रश्न आहे की, कोणता पक्षी असा आहे, ज्याला पंख नाहीत, तरीही तो उडूू शकतो. होय ना? तर मग त्याचं उत्तर आहे- माणसाचं मन.”
“”काय माणसाचं मन! ते कसं काय?”, गोरक्षनाथांनी विचारले.
तेव्हा त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर देताता गुरूदेव म्हणाले, “”होय माणसाचं मन. हाच एक असा पक्षी आहे की ज्याला पंख नाहीत, तरीही तो हवेत उडू शकतो, योजनेच्या योजने दूर प्रवास करीत जाऊ शकतो. त्याच्या त्या भ्रमंतीला, त्या भटकंतीला एक वेगळाच वेग आहे. मनाची ही गती कोणालाच मोजता येत नाही. ते इतकं वेगवान आहे की ते क्षणात इथे असते तर क्षणात दुसरीकडे. नेमकेपणे ते कुठे आहे याचा नेमका ठावठिकाणा सांगता येत नाही. बरं का गोरक्षा!
त्या तुझ्या बिन पंखाच्या पण तरीही वाटेल तिथे जाऊ शकणाऱ्या मनाला आवरायचे, त्याला स्थिर करायचे, त्याच्या चंचलतेला अस्थिरतेला, भटकंतीला संयमाचा, विवेकाचा लगाम घालायचा हेच परमार्थात सर्वात मोठे काम असते. एक साधक, ईश्वर उपासक म्हणून आपल्याला ते करावे लागते. या मनाचा अभ्यास, त्याची भ्रमंती आणि तिला आवर यालाच मनोजय किंवा मनोनिग्रह असे म्हणतात.”