मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास पित्याच्या अनुपस्थितीमुळे अपूर्ण राहतो, हे आज समाजाने समजून घेतले पाहिजे. आईसोबत राहणाऱ्या मुलांना भेटण्याच्या अधिकारासाठी वडिलांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी असे सांगितले की, पती-पत्नी यांनी विलग होणे हेच मुळात बालकांचे शोषण ठरते. पती-पत्नी वेगळे होताना होणाऱ्या भावनात्मक आणि मानसिक पिडेची शिकार अंतिमतः मुलेच ठरतात. आईवडिलांच्या नात्यात आलेली कटुता आणि वेगळे होण्याची कृती यांचा सर्वाधिक प्रभाव मुलांवरच पडतो, यात शंकाच नाही.
पती-पत्नी यांच्यातील संबंधांमध्ये माधुर्य आणि सामंजस्य असणे हीच आदर्श स्थिती होय; परंतु अनेकदा असे घडत नाही. विवाहाच्या आदर्श स्वरूपाला तडा गेला नाही, असा देश जगाच्या पाठीवर क्वचितच सापडेल; परंतु संबंधांमध्ये आलेला कडवटपणा हे मुलांचे व्यक्तित्व छिन्नविच्छिन्न होण्याचे कारण ठरता कामा नये. अधिकांश वैवाहिक विवादांच्या प्रकरणांमध्ये मुलांच्या संरक्षणाच्या अधिकाराची मागणी पती-पत्नीमधील रणभूमी ठरते आणि त्याचा थेट परिणाम मुलांवर होतो, हे दुर्दैवी वास्तव आहे. कोणताही शास्त्रीय आधार नसताना आईच मुलांच्या हिताचा सर्वाधिक विचार करू शकते, असे मानले गेले आहे आणि त्यामुळे पित्याच्या अधिकारांची नेहमीच अवहेलना झाली आहे. सामान्यतः मुलांच्या संरक्षणाचा अधिकार आईकडेच दिला जातो आणि पित्याच्या नशिबी आठवड्यातून-पंधरवड्यातून मुलांबरोबर काही वेळ व्यतीत करण्याचा अधिकारच फक्त येतो.
“डायवर्स पॉइझन ः हाऊ टू प्रोटेक्ट युवर फॅमिली फ्रॉम बॅडमाउथिंग अँड ब्रेनवॉशिंग’ या पुस्तकात रिचर्ड ए वर्शक यांनी अशी टिप्पणी केली आहे की, मुलांना पित्याची गरज असते, व्हिजिटिंग गेस्टची नव्हे! रिचर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटस्फोटामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्यांवरील अभ्यास 1970 च्या दशकाच्या अखेरीस सुरू केला. रिचर्ड यांना आपल्या अभ्यासात असे दिसून आले की, घटस्फोटानंतर वडील आणि मुले जेवढा वेळ एकमेकांसोबत व्यतीत करतात, त्यापेक्षा कितीतरी वेळ ते एकत्र राहू इच्छित असतात. अनेक वर्षांच्या अध्ययनानंतर रिचर्ड अशा निष्कर्षाप्रत पोहोचले की, मुलांच्या पालनपोषणात वडिलांची भूमिका आर्थिक आवश्यकतांपुरती सीमित करणे हा त्याच्यावरील अन्याय आहे. रिचर्ड असे म्हणतात की, जी मुले आईबरोबर व्यतीत केलेल्या वेळेच्या प्रमाणात वडिलांबरोबरही वेळ व्यतीत करतात, अशी मुले अभ्यासात, सामाजिक जीवनात एकल पालकाच्या सान्निध्यात वाढणाऱ्या मुलांच्या तुलनेत उजवी ठरतात.
मुलाच्या सामाजिक दुनियेत नगण्य स्थान देण्याची जी मानसिकता वर्षानुवर्षे जोपासली जात आहे, त्याला अनेक संशोधनांनी आणि अध्ययन अहवालांनी झटका दिला आहे. पितृसत्ताक व्यवस्थेत असे मानले जाते की, आईचे आणि मुलांचे नाते अद्वितीय आहे आणि समकालीन किंवा नंतरच्या काळातही अन्य कोणत्याही नात्यापेक्षा ते सर्वथा महत्त्वपूर्ण नाते आहे.
इन्वॉल्व्ड फादरहुड मॉडेलमध्ये पित्याचे सान्निध्य आणि पित्याची भागीदारी याविषयीच्या व्यापक दृष्टिकोनाची आवश्यकता आणि त्याच्या परिणामांची चर्चा केली आहे. पितृत्वाविषयी अध्ययनाचा प्रारंभ मायकेल लॅम्ब यांनी सत्तरच्या दशकात केला होता. लॅम्ब आणि अन्य काही संशोधकांना असे दिसून आले की, नवजात अर्भक अगदी सुरुवातीच्या वर्षांमध्ये ज्या प्रकारे आपल्या आईशी नैसर्गिक नाते निर्माण करते, तसेच संबंध ते त्याच्या पित्याशी प्रस्थापित करते. अति-आधुनिक विचारसरणीचे लोक तर पित्याच्या भूमिकेची आवश्यकता नगण्य असल्याचे सांगताना असा युक्तिवाद करतात की, जर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महिलेला गर्भधारणा होऊ शकते, तर पित्याची आवश्यकताच काय? आधुनिक विज्ञान अत्यंत हास्यास्पद रीतीने आपल्याला पित्याविना जीवनाचा विचार करण्याची अनुमती देते; परंतु असे करताना असा दृष्टिकोन बाळगणाऱ्या व्यक्ती अशा पिढीच्या निर्मितीची पायाभरणी करतात, जी नैराश्यग्रस्त असू शकते. “द कॅज्युअल इफेक्ट्स ऑफ फादर ऍबसेन्स’ या पुस्तकात सारा मॅकलानहा आणि डी. श्नाइडर पित्याच्या अनुपस्थितीच्या नकारात्मक परिणामांची चर्चा करतात.
“द फादर-चाइल्ड रिलेशनशिप ऍक्टिव्हेशन ः अ न्यू थ्योरी टू अंडरस्टॅंड द डेव्हलपमेन्ट ऑफ इन्फेन्ट मेन्टल हेल्थ’ हा डी पेक्वेट यांचा शोधनिबंध असे दाखवून देतो की, नवीन वास्तवांचा शोध घेणे, अडथळे दूर करणे, अनोळखी व्यक्तींच्या उपस्थितीत बेडर बनणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे आदी गोष्टींसाठी पित्याचे सान्निध्य मुलांच्या जीवनात महत्त्वाचे ठरते. आतापर्यंत असे मानले जात होते की, ऑक्सीटोसिन नावाचे संप्रेरक जन्मानंतर बाळाचे आणि आईचे संबंधांची पायाभरणी करण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु वास्तव असे आहे की, जे बाप आपल्या नवजात बालकांच्या संगोपनात सक्रिय राहतात, त्यांच्याही शरीरात ऑक्सीटोसिन संप्रेरकाचा स्राव सुरू होतो.
लॅम्ब यांच्या म्हणण्यानुसार, माता-पिता दोघांनीही मुलांच्या संगोपनात सक्रिय राहणे हीच मुलांसाठी आदर्श स्थिती ठरते. कारण, असे झाल्यास दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे तिसऱ्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करतात. बेब फॉरेस्ट युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका लिंडा निल्सन सांगतात की, आईवडिलांनी एकत्रितपणे पालनपोषण केल्यास मुलांमध्ये चिंता, नैराश्य किंवा तणावाशी संबंधित आजार कमी प्रमाणात दिसून येतात. एकत्रित पालनपोषणास विरोध झाल्यानंतरसुद्धा न्यायालयांनी तशी व्यवस्था केली, तर हळूहळू दोन्ही पक्षकार (पती-पत्नी) या वास्तवाचा स्वीकार करतील आणि ते मुलांच्या भवितव्यासाठी मोलाचे ठरेल.
पाश्चिमात्य देशांमध्ये पालनपोषणातील पित्याच्या सहभागाविषयी आणि मुलांच्या जीवनावरील त्याच्या सकारात्मक परिणामांविषयी सातत्याने संशोधन होत राहिले. त्यामुळेच तेथील न्यायव्यवस्थेतही घटस्फोटानंतरच्या एकत्रित पालनपोषणाची संकल्पना रुजली आहे; परंतु भारतात मात्र अशा संशोधनांचा अभाव असल्यामुळे पित्याच्या सान्निध्याची नेहमीच अवहेलना झाली आहे. सातत्याने वाढत असलेल्या व्यक्तिगत मतभिन्नतांच्या काळात पती-पत्नी यांनी अलग होऊच नये, असे म्हणणे अव्यावहारिक ठरेल; परंतु मुलांच्या एकत्रित संगोपनाच्या पर्यायावर न्यायपालिकेने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. अन्यथा मुलांच्या हिताच्या गोष्टी केवळ कागदावरच राहतील.