आजपर्यंत चीनने व्यापाराच्या जोरावर आपले प्रभुत्व स्थापित केले आहे. मागच्याच 2022 या वर्षाची आपण चीनकडून आयात केलेली आकडेवारी पाहिली तरी आपण चीनसोबतच्या आर्थिक युद्धात हरलो आहोत, हे सिद्ध होते. त्यामुळे 2023 मध्ये चिनी मल्टीडोमेन युद्धाला (आर्थिक युद्ध) प्रत्युत्तर कसे द्यायचे, त्याबाबत…
आर्थिक घुसखोरी, आर्थिक युद्ध, व्यापारयुद्ध, आजूबाजूच्या राष्ट्रांतून म्हणजे नेपाळ आणि इतर देश, तसेच समुद्रातून तस्करी करून भारताविरुद्ध आर्थिक युद्ध करून भारताच्या अर्थव्यवस्थेला डळमळीत करायचे, हा मल्टीडोमेंटचा एक अत्यंत मोठा आयाम आहे. हे युद्ध जिंकण्याकरता आपल्याला सरकारी आणि नागरिकांच्या स्तरावरती सर्वसमावेशक कारवाई करावी लागेल.
आर्थिक युद्ध आणि व्यापारयुद्ध जिंकण्याकरता प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे, असे आपण वेळोवेळी म्हणत असतो. मात्र, तसे होत नाही. भारतीय चीन विरुद्ध लढण्याऐवजी एकमेकांशी वेगवेगळ्या कारणामुळे भांडण्यांत गर्क आहेत. ज्यामुळे देशाची आर्थिक प्रगती ज्या वेगाने व्हायला पाहिजे, ती होत नाही. सद्यस्थितीच बघा, आपण म्हणतो नागरिकांनी चिनी वस्तू विकत घेऊ नये. परंतु या वर्षी चीनकडून होणारी आयात प्रचंड वाढलेली आहे आणि आयात आणि निर्यातीमधली तफावतही 125 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे.
कोठे आहे भारतीयांची देशभक्ती?
अर्थात याकरता सर्वात जास्त जबाबदार आहेत, भारतातील व्यापारी जे स्वस्तात चिनी वस्तू विकत घेतात व नफा कमावतात आणि दुसरे आहे उद्योग जगत, ज्यांना वाटते की, चीनशिवाय ते जिवंतच राहू शकत नाहीत.म्हणजेच गेल्या वर्षात चीनने भारताला आर्थिक आणि व्यापारयुद्धामध्ये हरवले आहे. आर्थिक युद्ध आणि व्यापारयुद्ध जिंकण्याकरता आपल्याला कच्च्या मालाकरता निर्मिती भारतात करावी लागेल किंवा चीन सोडून इतर देशांतून थोड्या जास्त दराने कच्च्या मालाची आणि इतर वस्तूंची आयात करावी लागेल, खासकरून जपान, तैवान, कोरिया किंवा साउथ-ईस्ट देशांतून.
चीनकडून होणारा अवैध आयात व्यापार, तस्करी थांबवा
चीनला “करन्सी मॅनिप्युलेटर’ आहे. आपले चलन, युआन हे डॉलर्सच्या तुलनेत कमी मूल्याचे राहावे, अशी चीनमध्ये गेल्या अनेक वर्षापासून “व्यवस्था’ करण्यात आली आहे. आर्थिक प्रगती कितीही वेगाने होत असली तरी चीनच्या चलनाचा दर काही वाढला नाही. या मागे चीनची भूमिका परदेशी उत्पादकांना चिनी बाजारपेठ मिळूच द्यायची नाही, अशी आहे.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा भाव, गेले काही दिवस सतत घसरून आपल्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. भरमसाठ चिनी आयात हे त्यामागचे मुख्य कारण आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याला एका डॉलरसाठी अवघे 45 रुपये मोजावे लागत होते आणि आता तर 81.29 रुपये इतकी एका डॉलरचे मूल्य झाले आहे. भारताकडून डॉलरची मागणी वाढत आहे, याचे कारण चीन वस्तूंची आयात वाढवत आहे.
भारताने अशा परिस्थितीत आयातीचे प्रमाण कमी करावे. भारतात होणारा अवैध आयात व्यापार जो चीनकडून होतो, हा कडक निर्बंधांखाली आणला पाहिजे. अवैध व्यापारासाठी भारताच्या सीमा बंद कराव्या लागतील. मात्र, त्यासाठी राष्ट्रीय कल्याणाची दुर्दम्य इच्छाशक्ती असली पाहिजे. स्वदेशीचा/मेक इन इंडियाचा पुरस्कार करणे आता काळाची गरज आहे. चीनचा सुमार असलेला माल अमेरिका आणि युरोपीय समुदायातील देशांनी अनेकदा नाकारला आहे. भारताने पण वेगवेगळी कारणे म्हणजे पर्यावरणाचे नुकसान, निकृष्ट दर्जा अशी कारणे सांगून चिनी माल नाकारला पाहिजे.
चिनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने आपण चिनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतो, त्यावर आपले लेबल लावतो आणि बाजारात विकतो. त्यात भरपूर पैसे कमावतो. पण यामुळे आपण चिनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत हे लक्षात घेत नाहीत. आपल्याकडे बेकारी वाढलेली आहे.
चीनशी जर आपल्याला मुकाबला करायचा असेल तर आपणही त्यांच्याप्रमाणे लघुउद्योग निर्माण करायला पाहिजे. त्यांना स्वस्तात जागा, मटेरियल उपलब्ध करून दिले पाहिजे. कर कमी केले पाहिजेत. यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू.
देशातील अर्थव्यवस्था थांबवण्यापेक्षा, श्रमदान करून विरोध व्यक्त करा
निदर्शने करणे, संप पुकारणे, रस्ते बंद करणे, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करणे किंवा रस्त्यांवरील वाहनांची तोडफोड करणे अशा अनेक कामांमध्ये आपल्याकडील काही लोक गुंतलेले आहे. काही संस्थां/राजकीय पक्षांना वाटते की बंद पुकारणे हा आमचा हक्क आहे. जर राजकीय पक्षांमध्ये कुठल्या विषयावरती मतभेद असतील तर ते मतभेद बंद पुकारून देशातील अर्थव्यवस्था थांबवण्यापेक्षा, श्रमदान करून किंवा जनतेकरता काही चांगले काम करून किंवा काळ्या फिती लावून आपल्याला आपला राग किंवा विरोध व्यक्त करता येणार नाही का? मीडिया बहुतेक वेळा चांगल्या कामांना फारशी प्रसिद्धी देत नाही. मात्र हिंसाचार झाला किंवा तोडफोड केली, तर लगेच त्याला पहिल्या पानावरती मोठी प्रसिद्धी मिळते, त्यामुळे हिंसाचार करणे हे एक शूरपणाचे लक्षण आहे असे काहीजण समजतात.
चिनी नागरिकांहून जास्त कार्यक्षम बनण्याची गरज
चीनमध्ये हिंसाचार, बंद करणे असे प्रकार फारसे होत नाहीत. चिनी नागरिक हे फक्त काम, काम आणि काम करतात, ज्यामुळे चीनला जगातली दुसऱ्या नंबरची आर्थिक ताकद बनण्यामध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे. जर आपल्यालाही आर्थिक महाशक्ती बनायचे असेल तर प्रत्येक नागरिकाला चिनी नागरिकांपेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाचे किंवा चिनी नागरिकांहून जास्त कार्यक्षम बनण्याची गरज आहे.चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. अशा वस्तू विकणाऱ्यांना मनाई करावी. प्रबोधन करावे. व्यापार ही चीनची सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे. त्यामुळे चिनी वस्तूंच्या व्यापारावर निर्बंध आले तर ते चीनला परवडण्यासारखे नाही.
चीनमध्ये वेगाने वाढणारा करोना, त्यामुळे आर्थिक व्यवस्थेमध्ये येणारी मंदी ही भारताकरता एक मोठी संधी आहे. या संधीचा वापर घेऊन भारत जगाचा कारखाना बनू शकतो आणि चीन आणि भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये असलेली तफावत मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकतो.