पाकिस्तानच्या भूमीवरील राजकारणामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कोणीही नेता असला, तरी भारतद्वेष या एकमेव निकषावर त्या नेत्याचे राजकारण सुरू असते. मात्र पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी गेल्या आठवड्यात केलेली काही विधाने पाहता भारतद्वेषापासून फारकत घेऊन सलोखा ठेवण्याचे पाकिस्तानला शहाणपण सुचले आहे, असेच म्हणावे लागेल.
भारताबरोबर झालेल्या तीन युद्धांमुळे पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पाकिस्तान अजूनही त्यातून बाहेर येऊ शकत नाही, याची कबुली शरीफ यांनी दिली आहे. भारताच्या सहकार्यानेच या पुढची वाटचाल करावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय सहकार्यावर भारताची भूमिका नेहमीच सौहार्दाची, शांततेची आणि चर्चा करण्याची राहिलेली आहे. पण पाकिस्तान मात्र दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना दहशतवादी कारवायांसाठी भारतात पाठवण्याचे काम गेले कित्येक वर्षे करत आहे. यावरून पाकिस्तानचा इरादा मात्र कधीही शांतता प्रस्थापित करण्याचा नव्हता हे आजवर सिद्ध झाले आहे. आता मात्र शरीफ यांच्या या विधानानंतर पाकिस्तानला शहाणपण सुचले, असे म्हणायचे असेल तर हे शहाणपण त्यांच्या कृतीतूनही दिसणे आवश्यक आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्याच आठवड्यात पाकिस्तानमधील अनेक माध्यमांनी भारताचे तोंडभरून कौतुक केले होते. जगभरातील सर्व अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारताने मात्र नियोजित पद्धतीने विकास केल्याने भारताची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सर्व देशांशी चांगले संबंध ठेवण्यातही भारताला यश आले आहे. याची दखल पाकिस्तानला घ्यावी लागेल, अशा शब्दांत पाकिस्तानी माध्यमांनी भारताचे कौतुक केले होते. त्यानंतर लगेच शरीफ यांनी आता भारताबरोबर चांगले संबंध ठेवण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे.
अर्थात, आजवरचा इतिहास पाहता त्यांचा कोणताच नेता विश्वासार्ह नाही. कारण त्यांना जर पाकिस्तानमध्ये लोकप्रियता मिळवायची असेल, तर भारतद्वेषाचे राजकारण करणेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे शरीफ यांनी आज जरी ही भूमिका मांडली असली, तरी नजीकच्या काळात त्यांची भूमिका पलटूही शकते. कारण पाकिस्तानच्या राजकारणावर पूर्णपणे लष्कराचे आणि लष्कराच्या नियंत्रणाखालील आयएसआय गुप्तहेर संघटनेचे नियंत्रण असते, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे शरीफ जर खरोखरच गंभीर असतील, तर येत्या काही कालावधीमध्ये त्यांनी भारताबरोबर संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून काही पावले टाकली तरच पाकिस्तानच्या नेत्यांना शहाणपण सुचले, असे सिद्ध होऊ शकेल. अशाप्रकारे शहाणपणाचे विचार व्यक्त करत असतानाच दुसरीकडे भारताचा गुन्हेगार आणि कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमला पाकिस्ताननेच कराचीमध्ये आश्रय दिल्याचेही सिद्ध झाले आहे.
प्रत्यक्ष दाऊद इब्राहिमच्या भाच्यानेच दाऊद कराचीतच पाकिस्तानच्या आश्रयाने राहात असल्याची कबुली भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याशिवाय मुंबईवरील हल्ल्याला जबाबदार असणारे अनेक दहशतवादी आणि त्यांचे नेतेही सध्या पाकिस्तानातच आश्रयाला आहेत, हेही लपून राहिलेले नाही. जर पाकिस्तानला खरोखर शहाणपणाचे प्रदर्शन करायचे असेल, तर त्यांनी दहशतवाद्यांना पाठिंबा देणे बंद करायला हवे आणि ज्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीवर आश्रय दिला आहे त्यांना भारताचे गुन्हेगार म्हणून भारताच्या ताब्यात देण्याचे काम आता सुरू व्हायला व्हावे. पाकिस्तानच्या नेत्यांनी अशाप्रकारे शहाणपणाचे प्रदर्शन करायला सुरुवात केली असेल, तर त्याचा फायदा आता भारतानेही घ्यायला हवा. दाऊदसारख्या दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी पाकिस्तानवर आताच दबाव टाकायला हवा.
पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, राजकीय स्थिती अतिशय खराब झाली असतानाच पाकिस्तानच्या पंतप्रधानाना हे शहाणपण सुचले आहे, हे विशेष. कारण तेथे महागाईने टोक गाठले आहे. ज्या वस्तू भारतामध्ये रास्त दरात उपलब्ध आहेत त्या वस्तू पाकिस्तानमध्ये दुप्पट-तिप्पट दराने नागरिकांना घ्याव्या लागत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो किंवा जागतिक बॅंक असो किंवा आशियाई विकास बॅंक असो या कोणत्याही संस्था आता संपूर्णपणे पाकिस्तानला आर्थिक मदत करतील, अशी शक्यता दिसत नाही. आगामी कालावधीमध्ये आशियातील महासत्ता म्हणून पाकिस्तानचे डोळे भारताच्याच मदतीकडे राहणार आहेत. ज्या प्रकारे भारताने गेल्या काही कालावधीमध्ये श्रीलंकेला मनापासून मदत केली आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था सावरावी यासाठी प्रयत्न केले आहे. तशाच प्रकारचे प्रयत्न भारत पाकिस्तानबाबतही करेल अशी अपेक्षा सध्याच्या पाकिस्तानी नेत्यांची असल्यानेच त्यांना हे शहाणपणाचे बोल सुचले आहेत, हे उघड आहे.
पूर्वीपासूनच भारताचे परराष्ट्र धोरण हे सहकार्याचे असल्यामुळे मानवी दृष्टिकोनातून नेहमीच भारत सगळ्यांना मदत करत आला आहे. नाणेनिधी असो, जागतिक बॅंक असो किंवा आशियाई विकास बॅंक असो या सर्वच संस्थांवर भारताचे वर्चस्व आहे. पाकिस्तानला सध्याच्या आर्थिक गर्तेतून बाहेर काढायचे असेल, तर या सर्व संस्थांची मदत गरजेची आहे आणि अशावेळी भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध असणे पाकिस्तानच्या फायद्याचे ठरणार आहे. पण पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांना कधीच स्वतंत्रपणे आपली भूमिका ठरवता येत नाही. कारण त्यांच्या भूमिकेवर नेहमीच लष्कराचे आणि आयएसआयचे नियंत्रण असते. जेव्हा जेव्हा पाकिस्तानमधील एखादा नेता अशी सलोख्याची किंवा सौहार्दाची भूमिका घेतो तेव्हा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पुढे करून एखादा मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणते, असे आजवर अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
काश्मीरच्या निमित्ताने का होईना, पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध संघर्षमय राहावेत अशीच नेहमी पाकिस्तानी लष्कराची आणि आयएसआयची भूमिका राहिली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी शहाणपणाची आणि सलोख्याची भूमिका प्रदर्शित केली असली, तरी त्यांची ही भूमिका प्रत्यक्ष आणण्यासाठी तेथील लष्कर आणि आयएसआय कितपत सहकार्य करणार यावरच हा शहाणपणा प्रत्यक्षात येणार की नाही, हे ठरणार.