– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
एरव्ही तरी पाहीं । जे जैसे माझ्या ठायीं । भजती तयां मीही। तैसाचि भजें ।। देखैं मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ। जाहलें असे केवळ । माझ्याचि ठायीं ।। परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासी आले । तेणेंचि त्या कल्पिलें । अनेकत्व।।
माऊली म्हणतात, श्रीकृष्ण अर्जुनाला प्रतिप्रादन करतात की जे साधक माझी जशी भक्ती करतात, तसाच मी देखील त्यांना भक्तीफलाद्वारा भजतो. त्यांना त्यांच्या सकाम-निष्काम भक्तीप्रमाणे फल देतो. मनुष्यजात कोणत्या ना कोणत्या फलाच्या उद्देशाने स्वभावतः भक्तीतत्पर असतात. ते फक्त माझ्या ठायी श्रद्धा ठेवणारे झाले आहेत. परंतु वास्तव स्वरूपाच्या ज्ञानाच्या अभावामुळे त्यांना बुद्धीभेद झाला आहे.
जे लोक मी आणि जीव यांच्यात भेद आहे अशा द्वैत तत्त्वज्ञानाला प्राप्त झाले त्यांना बौद्धिक दिवाळखोरीमुळे अनेकत्वाचा भास झाला आहे. अज्ञानामुळे अद्वैत वस्तूच्या ठिकाणी द्वैत असा भास त्यांना होतो. ते नामरहीत असलेल्या आत्मतत्त्वाला नाव देतात. देव-देवी असा भेद करून त्यांची आराधना करतात.