गुजरातमध्ये सलग अडीच दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या भाजपने सातव्यांदा ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निकालांमुळे कॉंग्रेसच्या घराणेशाहीविरुद्ध जनतेत किती असंतोष आहे, हे स्पष्ट होते. हिमाचलमध्ये पराभव झाला असला, तरी कॉंग्रेस व भाजपच्या मतांमध्ये एक टक्क्यापेक्षाही कमी फरक आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.
मात्र, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या राज्यात म्हणजे हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव केला असून, 68 पैकी 40 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 25 जागा प्राप्त झाल्या आहेत. हिमाचल प्रदेशात कधी भाजप, तर कधी कॉंग्रेस अशी आलटून पालटून सत्ता येत असली, तरी मोदींच्या करिष्म्याच्या बळावर हिमाचलमध्ये प्रस्थापित विरोधी लाट थोपवण्यात भाजपला यश आले नाही, हे विशेष. हिमाचलमध्ये कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी व अन्य नेत्यांनी प्रचार केला; परंतु विजय झाल्यानंतर सोनिया गांधी, राहुल अथवा प्रियांका यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयाबद्दल सकारात्मक टिप्पणी करणे आवश्यक होते. तेही घडले नाही. गुजरातमध्ये पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस कार्यालये ओस पडणे आणि हिमाचलमधील विजयानंतर जल्लोषही साजरा न करणे, असे कॉंग्रेस पक्ष का करत आहे, ते कळायला मार्ग नाही. या पराभूत आणि निराश मानसिकतेतून पक्षाने लवकरात लवकर बाहेर आले पाहिजे.
हिमाचल प्रदेशात भाजपमध्ये प्रचंड प्रमाणात बंडखोरी झाली. भाजपचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली 2017 साली भाजपने विधानसभेची निवडणूक लढवली; परंतु मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदी धुमल यांच्याऐवजी, जयराम ठाकूर यांची निवड केली. वास्तविक त्यात काहीही चूक नव्हती, याचे कारण धुमल यांचा स्वतःचा निवडणुकीत पराभव झाला होता. ठाकूर हे नड्डा यांचे निकटवर्तीय आहेत. हिमाचल प्रदेशमधील भाजपात धुमल व ठाकूर असे दोन गट पडले. धुमल यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अनेक बंडखोर उमेदवारांना फूस दिली आणि त्यातील किमान दहा बंडखोरांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला. सात कॅबिनेट मंत्र्यांचा तेथे पराभव झाला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसकडे तगडे नेतृत्व आणि निवडणूक जिंकून देणारा चेहरा राहिलेला नव्हता. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तसेच पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली. आता हिमाचलमध्ये प्रदेशाध्यक्ष व वीरभद्र यांच्या पत्नी प्रतिभा सिंह, सुखविंदर सिंह सुक्खू आणि मुकेश अग्निहोत्री यांच्यात स्पर्धा आहे. त्यापैकी प्रतिभा या खासदार असून, त्यांचा सुक्खू यांना विरोध आहे. तर मुकेश हे सलग पाचवेळा विधानसभेवर निवडून आले असून, कॉंग्रेसला प्रियांका यांच्या नेतृत्वामुळेच विजय मिळाला, असा दावा मुकेश यांनी केला आहे.
मुख्यमंत्रिपद मिळावे या दृष्टीने त्यांनी केलेली ही चापलुसी असून, ती कॉंग्रेस संस्कृतीत शोभून दिसणारीच आहे. प्रत्यक्षात हिमाचलमधील स्थिती अशी होती की, वीरभद्र सिंह यांच्यासारखा करिष्मा असलेला दुसरा नेता नाही आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचाही काहीही प्रभाव नाही. अशा वेळी प्रत्येक उमेदवारांचे मतदारांशी असलेले व्यक्तिगत संबंध व संपर्क यावरच पक्षाने भर दिला. मतदारसंघातील पक्षाच्या जवळची असलेली कुटुंबे, सामान्य कार्यकर्ते, छोटे छोटे व्यावसायिक, ठेकेदार किंवा गावातील प्रतिष्ठित लोक यांची मदत घेण्यात आली. काही भागात अजूनही इंदिरा गांधी यांचे नाव घेतले जाते. “इंदिराजीने जमीन देकर मालिक बना दिया, उसीको व्होट देंगे’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. हिमाचलमध्ये नेहरू-गांधी असो वा वीरभद्र सिंह घराणे, त्यांचा पक्षाला फायदाच झाला.
भूतकाळात कॉंग्रेसकडे वीरभद्र सिंह आणि भाजपकडे धुमल यांच्यासारखे नावाजलेले नेते होते. उलट जयराम ठाकूर यांच्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणून कोणताही वाद निर्माण झाला नाही, परंतु त्यांनी कोणतीही चमक दाखवली नाही. तिकीटवाटपापासून ते निवडणुकीतील धोरणात्मक निर्णयापर्यंत सर्व गोष्टी राज्यस्तरावर नव्हे, तर केंद्रीय स्तरावर ठरवल्या गेल्यामुळे, भाजपला फटका बसला. उलट कॉंग्रेसमध्ये सध्या पक्षाचे केंद्रीय नेतृत्व परिणामकारक नसल्याचा अप्रत्यक्ष फायदा पक्षाला मिळाला. कारण बहुतेक निर्णय राज्यस्तरावर घेतले गेले वा त्यांना विश्वासात घेऊन घेण्यात आले. हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाला पाठिंबा देणारा पारंपरिक मतदार नाही वा पक्षाचे राज्यात कामही नाही. संपूर्ण राज्य दोन पक्षांमध्ये विभागले गेल्यामुळे, “आप’ला तेथे चंचुप्रवेश करण्यास वावच मिळाला नाही. शिवाय हिमाचलमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत शिक्षण आणि आरोग्यसेवा उत्तम आहेत.
अर्थव्यवस्थेत आणि कर्मचारी व कामगारांत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पंजाब, गुजरात वा दिल्लीत “आप’ला जे यश मिळाले, तसे हिमाचलमध्ये बिलकुल मिळाले नाही. शिवाय हिमाचलमध्ये प्रत्येक मतदारसंघातील सरासरी मतदारांची संख्या 73 हजार असून, 2017 साली विजयाचे सरासरी मताधिक्य 5,600 होते. अशा वेळी प्रत्येक घराशी वा वस्तीशी उमेदवाराचे नाते कशा प्रकारचे आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बनतो.
“देखिये, कास्ट से जादा काम देखा जाता है’, असा सूर मतदारांमध्ये ऐकू येतो. हिमाचलमध्ये भाजप सरकारचे काम जनतेला रुचलेले नव्हतेच. शिवाय ज्या राज्यात भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी थेट लढत असते आणि जेथे कॉंग्रेसचे पारंपरिक संघटन सक्रिय असते, तेथे मोदींच्या नावावर विजय मिळतो असे नाही. यापूर्वी झारखंड, कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत कॉंग्रेसने मोदी लाटेवर मात करून दाखवली होती. म्हणजे मोदींचा पराभव करता येऊ शकतो. त्यासाठी सोनिया, राहुल वा प्रियांका गांधींचीच गरज असते, असे नाही. सत्तेत नसतानाही पक्ष कार्यकर्ते चिकाटीने काम करत राहिले, तर महाशक्ती व मोदींवरही मात करता येते, हे हिमाचलसारख्या छोट्या राज्याने दाखवून दिले आहे. हिमाचलमधील या मुंगीच्या महाभारतापासून हाच बोध घ्यायचा.