-हेमंत देसाई
भाजपने शिरोमणी अकाली दल, शिवसेना यासारखे मित्रपक्ष गमावले आहेत. मायावतींकडे बहुजनांची व्होटबॅंक आहे. शिवाय बसपाला मुस्लिमांमधून मोठा पाठिंबा मिळतो. बसपा बरोबर आल्यास उत्तर प्रदेशातील पुढील विधानसभा निवडणुकीत ज्या 2022 साली होणार आहेत, भाजपचा प्रचंड फायदा होऊ शकतो. बसपा आपल्या समवेत न आल्यास मायावतींविरुद्धची भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढली जातील, हे सांगायला नकोच.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सहा जागा पटाकावून भाजपने राज्यात आपली हुकूमत सिद्ध केली आहे. समाजवादी पार्टी किंवा सपाला केवळ एक जागा मिळाली. भाजपचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांच्या पत्नी संगीता चौहान या नौगाव सादत मतदारसंघात विजयी झाल्या. त्याचप्रमाणे उषा सिरोही (बुलंदशहर), प्रेमपाल धनगर (तुंडला), श्रीकांत कटियार (बंगरमऊ), सत्यप्रकाशमणी त्रिपाठी (देवरिया) आणि उपेंद्रनाथ पासवान (घाटमपूर) हे भाजपचे अन्य उमेदवार विजयी झाले. सपाचे उमेदवार लकी यादव मलहानी मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवाराचा पराभव केला. बंगरमऊ हा मतदारसंघ उन्नावमध्ये येतो. कुलदीप सेंगर यांचे बलात्कारकांड तेथे गाजले होते आणि तरीदेखील तेथे भाजपचाच उमेदवार विजयी झाला, हे लक्षणीय मानता येईल. मध्य प्रदेश वा गुजरातमधील पोटनिवडणुकांतही भाजपने उल्लेखनीय यश मिळवले. कॉंग्रेस पराभवाची चिकित्साच करत नाही आणि पक्षाच्या नेतृत्वात चैतन्यही नाही, हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या टीकेवरून स्पष्ट होते.
2014 मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव का झाला आणि त्यानंतर पक्ष सतत अपयशी का ठरत आला याची चर्चाच झालेली नाही, अशी कडवट टीका सिब्बल यांनी केली आणि ती पटण्यासारखीच आहे. परंतु कॉंग्रेस निदान भाजपच्या विरोधात कशीबशी का होईना, लढाई तरी खेळतो. पण बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती या केव्हाही आणि कशाही बाजू बदलू शकतात. पूर्वी त्या कॉंग्रेसच्या जवळ होत्या. आता मात्र त्या भाजपच्या जवळ सरकू लागल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांतही कॉंग्रेसचा पराजयच झाला आणि तेथील मायावतींची भूमिका संशयास्पदच राहिली.
अलीकडे राज्यसभेच्या अकरापैकी नऊ जागा भाजपने जिंकल्या. त्यामुळे भाजपच्या राज्यसभेत आता 92 जागा झाल्या आहेत. राज्यसभेचे एकूण संख्याबळ आहे 245.
भाजप व त्याच्या मित्रपक्षांकडे 110 जागा असून, कॉंग्रेसकडे आता फक्त 38 जागा उरल्या आहेत. वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल अशा लहान पक्षांकडे मिळून एकूण तीस जागा आहेत. हे पक्ष महत्त्वाच्या प्रश्नांच्या वेळी भाजपच्या बाजूनेच मतदान करतात. त्यामुळे राज्यसभेत विरोधी पक्ष यापुढे भाजपची कोंडी करू शकणार नाहीत. म्हणूनच वादग्रस्त कृषी विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. प्रत्यक्ष मतदान घ्या, अशी मागणी करण्यात आली, पण भाजपने तिकडे लक्षच दिले नाही. लोकसभेत बसपाचे दहा आणि राज्यसभेत पाच सदस्य आहेत. भाजपने बसपाच्या रामजीलाल गौतम यांच्याविरुद्ध राज्यसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे ते निवडूनही आले. परंतु भाजप कोणतीही गोष्ट फुकट करत नाही. त्यामुळेच आपण भाजपच्या बाजूने मतदान करणार आहोत, असे मायावती यांनी जाहीर करून टाकले.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या मागील निवडणुकीत सपाशी समझोता करूनही बसपाच्या हातात काहीच लागले नाही. त्यामुळे सपाबरोबरची आघाडी बसपाने तोडून टाकली आहे. उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या निवडणुका जेव्हा होतील, तेव्हा बसपा भाजपला समर्थन दऊ शकेल, असे उद्गार गेल्याच महिन्यात मायावतींनी काढले होते. सपाने बसपाचे सात आमदार आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला आहे, असा मायावतींना संशय आहे. या सातपैकी चारजणांनी बसपाला राज्यसभा निवडणुकीत विजय मिळू नये, यासाठी षड्यंत्र रचल्याचा त्यांना संशय आला. त्यानंतर या सातही आमदारांना बसपामधून निलंबित करण्यात आले. आगामी विधानपरिषद निवडणुका सपाला लोळवण्यासाठी वाटल्यास भाजपलाही पाठिंबा देऊ, असे मायावतींनी स्पष्ट केले.
अलीकडील काळात बसपा आणि भाजप यांच्यातील संबंध वाढत असल्याचा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला होता. मायावतींच्या वक्तव्यामुळे या आरोपावर शिक्कामोर्तबच झाले. राज्यसभा निवडणुकांत भाजपकडे पुरेसे आमदार असूनही, त्याने बसपाविरुद्ध उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे केवळ 18 आमदार असूनही बसपाने आपला उमेदवार उभा केला, तो भाजपचा पाठिंबा मिळेल, हे गृहीत धरूनच. उभयतांतील हे संगनमत उघडकीस आणण्यासाठीच सपाने अपक्ष उमेदवार प्रकाश बजाज यांना पाठिंबा जाहीर केला.
“मी राजकारणातून संन्यास घेईन, परंतु भाजपशी समझोता करणार नाही किंवा भाजपसोबत हातमिळवणी करून निवडणूक लढवणार नाही,’ असे मायावतींनी जाहीर केले होते. “भाजप हा संकुचित आणि जमातवादी विचारांचा पक्ष आहे. बसपाच्या विचारसरणीशी त्याचे जुळणारे नाही,’ असेही मायावती यांनी म्हटले होते.