-माधव विद्वांस
कुस्तीचा आखाडा आणि रूपेरी पडद्यावर चमकणारे “रुस्तम-ए-हिंद’ दारा सिंह यांचा आज जन्मदिन. त्यांचे पूर्ण नाव दीदार सिंह रंधवा. त्यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील धर्मूचाक गावात बड्या जमीनदार शेतकरी कुटुंबात 19 नोव्हेंबर 1928 रोजी झाला. वयाच्या 17 व्या वर्षांपर्यंत त्यांनी शेती केली.
लहानपणापासूनच त्यांना कुस्तीची आवड होती. आखाड्यात सुरुवातीला ते डावपेचांचे निरीक्षण करायचे व गावातील जत्रा, इतर कार्यक्रमांमध्ये कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. त्या काळातील गावाकडचे लोक कामधंदा व अर्थार्जन यासाठी सिंगापूरला जात असत. त्यामुळे दाराही वर्ष 1947 मध्ये सिंगापूरस्थित काकांकडे गेले. एका ठिकाणी त्यांना रात्रीच्या पहारेकऱ्याची नोकरी मिळाली. रात्री पहारा करायचा आणि दिवसा गामा पहिलवानाच्या गोष्टी ऐकायच्या, असा त्यांचा दिनक्रम होता.
त्यांची आवड पाहून एका सहकाऱ्याने त्यांना कुस्तीसाठी प्रोत्साहित केले व वस्तादाकडे नेले.वस्तादाने त्यांना कुस्तीचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले. ग्रेट वर्ल्ड स्टेडियममध्ये हरनामसिंग यांच्याकडे कुस्तीचे प्रशिक्षण सुरू केले. असे म्हणतात की, त्यांनी पहिला व्यावसायिक लढा इटालियन कुस्तीपटूविरुद्ध दिला. तो अनिर्णित राहिला होता. या झुंजीनंतर त्यांना पन्नास डॉलर्स मिळाले. त्यानंतर पहारेकऱ्याची नोकरी सोडून त्यांनी कुस्तीला पूर्णपणे वाहून घेतले.
त्यांची उंची 6 फूट 2 इंच होती तसेच वजन 127 किलो होते, तर छाती 57 इंच होती. उंची, वजन आणि चपळता यामुळे ते कुस्तीजगात प्रभावी ठरले. कालांतराने त्यांनी सिंगापूरवरून इंडोनेशिया आणि श्रीलंका येथे दौरे करून अनेक पैलवानांना हरविले. कुस्तीगीर म्हणून नाव कमवून ते भारतात आले. त्या वेळी युरोपीय कुस्तीगीर किंगकॉंगचा खूप बोलबाला होता.
किंगकॉंग ताकदवान, गर्विष्ठ आणि उद्धट होता. दारा सिंहांनी मुंबईत कुस्ती खेळून त्याचा पाडाव केला. 200 किलो वजनाचा प्रसिद्ध मल्ल किंगकॉंग याला हरवून, उचलून गरागरा फिरवून आखाड्याबाहेर फेकले. किंगकॉंगला हा अपमान जिव्हारी लागला आणि तो सिंगापूरला कायमचा निघून गेला. त्यानंतर दारा सिंह युरोप दौऱ्यावर गेले व अनेक कुस्त्या खेळले. वर्ष 1959 मध्ये कॅनडाला जाऊन तिथे कुस्त्या खेळून, राष्ट्रकुल ट्रॉफी जिंकून ते भारतात परत आले. त्यांनी आपल्या मल्लयुद्ध कारकिर्दीत 500 कुस्त्या जिंकल्या. हा एक विक्रमच म्हणावा लागेल.
त्यांची कुस्ती बहरात आली होती. कुस्ती बरोबर त्यांनी तब्येत, नाव आणि धनही कमवायला सुरुवात केली होती. त्यांना भविष्याची पण चिंता होती. त्याच दरम्यान वर्ष 1952 मध्ये आर. सी. तलवार दिग्दर्शित “संगदील’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा छोटी भूमिका केली होती. त्यानंतर एका तामिळी चित्रपटातही त्यांनी काम केले. वर्ष 1960 मध्ये त्यांनी “किंगकॉंग’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने त्यांना रुपेरी पडद्याची खरी ओळख दिली. या चित्रपटाने पैसे नाही पण अफाट प्रसिद्धी मिळाली.
पुढील दोन वर्षांत दारा सिंह यांना “सॅमसन’, “हर्क्युलस’, “तुफान’, “आया तुफान’, “फिर आया तुफान’, “थीफ ऑफ बगदाद’ आणि “टारझन’ यांसारखे डझनभर चित्रपट मिळाले. त्यांनी त्यानंतर सुमारे 115 चित्रपटांमध्ये काम केले. वर्ष 1987 मध्ये दूरदर्शनवर रामायण सुरू झाले व हनुमानाच्या भूमिकेत ते दोन वर्षे छोट्या पडद्यावर झळकत राहिले. त्यांनी चित्रपट दिग्दर्शन व निर्मितीही केली. त्यांनी स्वतःचा स्टुडिओ उभारला होता. वर्ष 2012 मध्ये त्यांचा “आता पता लापता’ हा शेवटचा चित्रपट. यात पाहुणे कलाकार म्हणून त्यांनी काम केले. 12 जुलै 2012 रोजी दारा सिंह यांचे निधन झाले.