दरवर्षीप्रमाणे घरात सत्यनारायणाची पूजा चालली होती. त्या सत्यनारायणाच्या कथेच्या प्रसादाचे महत्त्व सांगणारा अध्याय गुरुजी रंगवून सांगत होते. प्रसाद मराठी भाषेतला एक शब्द. या शब्दात एक संधी आहे. प्र+साद= प्रसाद.
प्रसाद मग तो कोणत्याही देवळातला, मठ मंदिरातला असो नाहीतर पूजेचा असो. प्रसादाच्या बाबतीत तीन गोष्टी प्रामुख्याने सांभाळाव्या लागतात. एक म्हणजे प्रसादाला नावं ठेवू नये. प्रसादाचा अव्हेर करू नये आणि प्रसाद टाकू नये. कारण त्या प्रसादामागचं मर्म असं आहे की, ज्या वेळी एखादं फळ, वस्तू पदार्थ हा पुन्हा आपल्याकडे जेव्हा देवाच्या कृपेसह, त्याच्या आशीर्वादासह परत येतो. तेव्हाच त्या वस्तूला, नारळाचा प्रसाद, आम्रफळाचा प्रसाद, पेढे बर्फीचा प्रसाद असं आपण म्हणतो आणि तो मोठ्या श्रद्धेने स्वीकारतो. एखाद्या पदार्थाला प्रसादाचं स्वरूप कसं प्राप्त होतं ते एका उदाहरणावरूनच पाहूया.
पदार्थ तेच साधारण तो पदार्थ करण्याची कृती, त्यातले उपघटक ही तेच; पण एरवी आपण तयार केला की त्याला आपण शिरा असे म्हणतो. पण जेव्हा शिऱ्याचे पातेले सत्यनारायणाच्या पुढे ठेवून नैवेद्य दाखविला जातो तेव्हा तो शिरा सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून मोठ्या श्रद्धेने ग्रहण करतो.
प्रसाद या संकल्पनेत आपण केलेल्या पूजा, सेवा याचा देवाकडून आलेला प्रतिसाद असा ही एक गुढार्थ त्यात दडलेला आहे. देवाकडून स्वीकृती करून आलेला, आपल्या भक्तिभावानं घातलेल्या सादेला त्याच्याकडून ते प्रसाद रूपाने आलेलं उत्तर किंवा प्रतिसाद असतो.
प्रसादाचे प्रकार जरी भिन्न असले तरी त्यामागची भावना, श्रद्धा एकच असते. वस्तूरूप प्रसाद, पदार्थरूप प्रसाद, कृपाप्रसाद, काव्यप्रसाद, लेखनप्रसाद असे प्रसादाचे प्रकार असतात आणि ते त्या त्या उपासकाला, भक्ताला, भाविकाला मिळत असतात. भगवंताचा आशीर्वाद, त्याची कृपा, त्याचे वरदान हासुद्धा एक प्रकारचा लाभणारा प्रसादच असतो आणि म्हणूनच त्याचा तेवढ्याच श्रद्धेने स्वीकार करायचा असतो.