संदेशवहनासाठी अवकाशात पाठवलेले स्टारलिंक कंपनीचे चाळीस कृत्रिम उपग्रह फेब्रुवारीमध्ये कोसळण्याचा धोका होता. तर युरोपियन स्पेस एजन्सीच्या एका अहवालानुसार पृथ्वीभोवती परिभ्रमण करणारे अनेक कृत्रिम उपग्रह आपली कक्षा सोडून वर्षाला अंदाजे दोन-अडीच किलोमीटर खाली येत आहेत. हे उपग्रह अवकाशात सोडताना त्यांची कक्षा काटेकोरपणे आखलेली असते. पण ते थोड्या खालच्या कक्षेत फिरायला लागले तर ते पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वाढते. त्यातून दर वर्षी हे उपग्रह थोडे थोडे खाली येत राहिले तर ते कधीही कोसळू शकतात.
अनेकदा निरुपयोगी झालेले कृत्रिम उपग्रह ठरवून खाली पाडता येतात. त्यावेळी योग्य नियोजनाने ते समुद्रात पडतील अशी व्यवस्था करता येते. मात्र, कक्षेतून घसरत चाललेले उपग्रह अकस्मात कोसळले तर ते कुठेही, अगदी भर वस्तीतही कोसळू शकतात. त्यामुळे पडणाऱ्या उपग्रहांचा धोका दिवसेंदिवस वाढायला लागला आहे.
यामागे कारण काय असावं, याचा अभ्यास गेली चार-पाच वर्षे सुरू आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या किंचित वरून भ्रमण करणाऱ्या उपग्रहांवर वातावरणाचा परिणाम होतो; पण थोडासाच. तुलनेत मात्र सूर्याकडून येणाऱ्या दमदार सौर वाऱ्याचा त्यांना सतत सामना करावा लागतो. उपग्रहांची आखणी करताना या परिणामांची काळजी घेतलेली असते; पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. गेल्या तीन वर्षांमध्ये पाहिलं, तर सौर वादळांची संख्या वाढली आहे आणि त्याचा प्रभाव तर उपग्रहांवर पडत नाही ना, अशी शंका आता व्यक्त होते आहे.
सौर डागांचं अकरा वर्षांचं चक्र असतं. या कालावधीत सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात घडामोडी होत राहून सौर वारे, सौर डाग यांचं प्रमाण वाढत जातं आणि मग घटत जातं. सध्याचं चक्र डिसेंबर 2019 मध्ये सुरू होऊन 2030 पर्यंत चालेल. त्यात 2025 मध्ये सर्वाधिक तीव्रता असेल असा नासाचा अंदाज आहे. म्हणजे आणखी दोन-तीन वर्षे हे उद्रेक वाढतील आणि मग हळूहळू कमी होतील.
या चक्राचा संबंध उपग्रहांची कक्षा बदलण्याशी असेल तर आपण काय करू शकतो? एक म्हणजे सतत निरीक्षण करत राहाणे. कक्षा दुरुस्त करण्यासाठी बहुतांशी उपग्रहांमध्ये आवश्यक ती यंत्रणा असते. ती वापरून उपग्रहांना मूळ कक्षेत परत नेता येतं. पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह, जुन्या यानांचे तुकडे, इतर कचरा हे उपग्रहांवर आदळण्याची कायम भीती असते. त्यामुळे वेळोवेळी अशी कक्षा दुरुस्त करण्याची गरज असते. तेव्हा उपग्रहांना मूळ कक्षेत परत नेणं हा एक उपाय आहे.
दुर्दैवाने काही जुन्या, विशेषत: रशियाच्या उपग्रहांमध्ये अशी यंत्रणा नाही. त्यांचा धोका आपल्याला कायम रहाणार आहे. त्यामुळे येती दोन-तीन वर्षे या दृष्टीने महत्त्वाची आहेत. अर्थात रॉकेट सोडून असे धोकादायक उपग्रह अवकाशात नष्ट करण्याचे प्रयत्न यशस्वी झालेले असल्याने ते पृथ्वीवर आदळण्याची भीती तितकीशी उरलेली नाही.