आकडेमोड जोरात चालू आहे. किती लाख कोटी रुपयांचा उद्योग कुठून कुठे आणि का गेला? तो आपल्याकडे आला असता, तर किती तरुणांना रोजगार मिळाला असता? किती हजार कोटी रुपयांची अलाइड इंडस्ट्री उभी राहिली असती? त्यातून किती जणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या? कुणाला, कुणी, किती कोटी रुपयांचं पॅकेज देऊ केलं? उच्चस्तरीय बैठकीची तारीख? प्रकल्पाला किती सवलती देण्याच्या शिफारशी सचिवांच्या समितीनं केल्या होत्या? ऍक्च्युअली किती देऊ केल्या? “तिकडच्यांनी’ किती सवलती दिल्या? सवलतींमधला नेमका फरक किती? प्रकल्प तिकडे नेण्याच्या निर्णयाची तारीख किती? ती तारीख यांना सोयीची की त्यांना? बघता-बघता संपूर्ण महाराष्ट्र आकडेमोड करू लागला. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊ लागला.
आकडेमोड करण्याची महाराष्ट्राची ही काही पहिलीच वेळ नाही. मेट्रो रखडल्यामुळे किती नुकसान झालं? रिफायनरी झाली नाही त्यामुळे किती नुकसान झालं? आता परत आलीच तरी नुकसानच होईल, ते किती असेल? बंदराचा विकास लांबल्यामुळे नेमकं कितीचं नुकसान झालं? अशी आकडेमोड महाराष्ट्राने अलीकडच्या काळात किती वेळा केली, याचीच आकडेमोड आता करायला पाहिजे. आकडेमोड केवळ नुकसानीचीच असते, हे महाराष्ट्राचं दुर्दैव. मेट्रोच्या बाबतीत तर पैसेही गेले आणि झाडंही गेली, अशी अवस्था! पण खापर फोडण्यासाठी डोकं शोधणं हाच मुख्य कार्यक्रम. कुणाची किती मतं गेली हीच खरी आकडेमोड..!
आता “तिकडची’ आकडेमोड पाहा. गौतम अदानी जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कधी होणार, याची माहिती काही दिवस आधीच सर्वांना मिळाली होती. त्यासाठी त्यांची संपत्ती किती व्हायला हवी आणि ती तेवढी कधी होईल, याची आकडेमोड आधीच पूर्ण झालेली होती. अवघ्या 17 दिवसांत अदानींची संपत्ती 12.32 लाख कोटी रुपये होईल आणि सध्या जगात सगळ्यात श्रीमंत असलेल्या ऍलन मस्क यांच्या खालोखाल अदानींचा नंबर लागेल, अंबानींचा नंबर आठवा असेल, हे सगळं आधीच प्रसिद्ध झालेलं..!
बड्या व्यक्तींचं सोडा. “तिकडच्या’ सामान्य माणसाची आकडेमोड पाहा. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या रमेश सागर यांच्या बॅंक खात्यावर चुकून 11,677 कोटी रुपये जमा झाले. आपल्याला एवढी मोठी रक्कम कुणाकडूनच येणं नाही, सबब हे पैसे आले तसे परत जाणार हे त्यांना ठाऊक होतं. परंतु तेवढ्यात त्यांनी त्यातले दोन कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि दुपारी बारा ते साडेबारा या अवघ्या अर्धा तासात 5.64 लाखांचा शुद्ध नफा कमावला. तो त्यांनी स्वतःच्या व्यवसायात गुंतवला. बॅंकेत जमा झालेले अतिरिक्त पैसे रात्री आठ वाजता परत गेले. एका दिवसातल्या यशाबद्दल विचारलं तर ते सांगतात, “मी लगेच निर्णय घेतो.’
“तिकडच्यांचं’ हेच वैशिष्ट्य. झटपट आणि गुपचूप निर्णय घेऊन मोकळे होतात. म्हणूनच, कुणाच्या निर्णयामुळे किती वाताहात झाली, हे ठरवण्यासाठी त्यांना एकमेकांच्या उरावर बसावं लागत नाही. आपल्याकडे झटपट आणि गुपचूप निर्णय कुठले होतात, हे विधानसभेची निवडणूक झाल्यापासून कधी रात्रीच्या तर कधी पहाटेच्या अंधारात आपल्याला सगळ्यांनीच दाखवून दिलंय. कुणीही अपवाद नाही. मोजमाप फक्त आमदारसंख्येचं! तरीही आपण बिनपगारी कारकून बनून आकडेमोड करतोयच… कुणाचं किती नुकसान झालं याची..!