मोहाली – ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ भारतात दाखल झाला असून या दोन संघात येत्या मंगळवारपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला सामना येथील पंजाब क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होणार आहे. मोहालीतील आतापर्यंतची भारतीय संघाची कामगिरी यशस्वी राहिली असून आतापर्यंत येथे झालेल्या तीनही टी-20 सामन्यांत भारताचाच विजय झाला होता.
ऑस्ट्रेलियाने 20 सप्टेंबरपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मोहालीमध्ये सराव सुरू केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या दौऱ्यात अनुभवी डेव्हिड वॉर्नरला विश्रांती दिली असून कॅमरून ग्रीन त्याच्या जागी खेळणार आहे. मिचेल मार्श आणि मार्कस स्टोनिस दुखापतींमुळे दौऱ्यात खेळणार नसल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सहा वर्षांनंतर मोहालीत टी-20 सामना खेळणार आहे. त्याने 2016 साली विश्वकरंडक टी-20 स्पर्धेत भारताविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता व त्यात त्यांना सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाने या मैदानावर एकूण दोन टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी मार्च 2016 साली पाकिस्तानचा 21 धावांनी पराभव केला होता. भारताने या मैदानावर तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत व हे सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्यांनी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला आठ सामने खेळायचे आहेत. भारतानंतर त्यांचा संघ वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.
कोरोनाची बाधा झाल्यामुळे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमीला माघार घ्यावी लागली असली तरी दुसरीकडे भारतीय संघ मात्र त्याच्या सर्वोत्तम संघासह ही मालिका खेळेल. भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंना मागच्या काही महितन्यांमध्ये विश्रांती मिळाली आहे.
संघाकडे सर्वोत्तम पर्याय
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे सर्वोत्तम अकरा खेळाडूंना निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. माजी कर्णधार विराट कोहली भरात आलेला असल्याने दिलासा तर मिळाला आहे. तसेच नवोदित गोलंदाजही सरस कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबरला, तर दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये खेळला जाईल. तिसरा आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल.