पत्रकार परिषद कोणत्या विषयावर घेतली जाते आणि “ब्रेकिंग न्यूज’ काय येते, हे आता आपल्याला चांगलंच माहीत आणि सवयीचंही झालंय. पत्रकार परिषद असो, सभा असो, संमेलन असो किंवा एखाद्या पक्षाची बैठक असो. त्यातलं सर्वाधिक “भडक वाक्य’ हा बातमीचा मथळा बनतो आणि ज्या विषयावर खरोखर चर्चा व्हायला हवी, तो मागेच पडतो.
राजकारणी मंडळींची एकमेकांवरची चिखलफेक इतकी “कॉमन’ झालीये, की आपला “कॉमन सेन्स’ कामातून गेलाय. आपल्यालाही जहरी भाषेतल्या टीकेचा “आस्वाद’ घेण्याची सवय जडलीय. पण ज्याच्यावर टीका होते, त्याच्या जागी आपण स्वतः आहोत, असा विचार आपण कधी केलाय का? अर्थात “एन्जॉय युवर ट्रोल्स’च्या जमान्यात हा कोडगेपणाही “कॉमन’च झालाय. पण ज्याच्यावर चिखलफेक केली जाते, त्यांच्या मुलांचा विचार मात्र ब्रिटनच्या लिसेस्टर विद्यापीठानं केलाय.
जगभरातल्या राजकारणी व्यक्तींच्या व्यक्तिगत जीवनावर केलेल्या संशोधनात असं दिसून आलं, की नेतेमंडळींच्या मुलांवर इतर मुलांच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात दबाव असतो. इतर मुलांपेक्षा त्यांच्यावर टीकाटिप्पणीही अधिक केली जाते. त्यातल्या त्यात जर त्यांचे पालक जर एखाद्या गैरव्यवहारात अडकले असतील, तर अशा मुलांवर अधिक टीका होते. अर्थात, भारतातील राजकारणी (आणि त्यांची मुलंही) या सगळ्याला अपवाद ठरणं शक्य आहे. कारण हीच “नेता बनण्याची पूर्वतयारी’ असल्याचं पालक पाल्याला ठासून सांगत असतील.
दबावामुळे प्रसंगी मानसिक आजाराला बळी पडणाऱ्या अशा मुलांचा अभ्यास करणारे संबंधित संशोधक भारतात आले होते की नाही, कुणास ठाऊक! त्यांच्या अहवालात म्हटलंय की नेत्यांच्या मुलांवर समवयस्कांपेक्षा अधिक प्रसिद्धी मिळवण्याचा दबाव असतो. (आपल्याकडे, अशा दिवट्यांना समवयस्कांच्या तुलनेत आपोआपच अधिक प्रसिद्धी मिळते) संशोधक म्हणतात, नेत्यांच्या मुलांनी चुका करणं आणि सर्वसामान्य मुलांनी चुका करणं यात फरक आहे, कारण अशा वेळी नेत्यांच्या मुलांवर अधिक टीका होते. (आपल्याकडे नेत्यांच्या मुलांना प्रत्येक चूक माफ असते; किंबहुना क्वचितप्रसंगी ती “कौतुकास्पद’ही ठरू शकते)
संशोधन अहवाल असं सांगतो की, इतर मुलं ज्या गोष्टी मोकळेपणानं करू शकतात, ते राजकारणी मंडळींच्या मुलांना करता येत नाही. (आपल्याकडे राजकारण्यांच्या मुलांना एखादी गोष्ट मुक्तपणे करायची हुक्की आली तर इतर मुलांना टेन्शन येतं, कारण त्यांचा मुक्तपणा धोक्यात येऊ शकतो) मुलांना वेळ देता येत नाही म्हणून बहुसंख्य राजकारणी त्यांच्या मुलांना परदेशात शिकायला पाठवतात, असं हे संशोधन सांगतं. (आपण या बाबतीतही “अपवाद’च आहोत. राजकारण्यांची पोरं परदेशात शिक्षणासाठी का जातात, या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. व्यक्तिपरत्वे परिस्थिती भिन्नभिन्न असल्यामुळे या कारणांची स्वतंत्र चिकित्सा करावी लागेल)
नेत्यांबरोबर बातम्यांमध्ये अनेकदा मुलांच्याही नावांचा समावेश होत असतो. त्याचा मुलांवर प्रतिकूल मानसिक परिणाम होऊ शकतो, असं ब्रिटनमधले संशोधक सांगतात. (आपल्याकडे राजकारण्यांच्या अपत्यांचा उल्लेख बातम्यांमध्ये जास्तीत जास्त यावा, यासाठी स्पर्धा लागलेली असते. किंबहुना माध्यमांकडून ही मुलं जर बराच काळ दुर्लक्षित राहिली, तर मात्र त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो) आपल्याकडील वस्तुस्थिती या संशोधनातील निष्कर्षांना अपवाद का ठरते, यावर संशोधन व्हायला हवं.